लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीपात्रात दूषित आणि मलमूत्र सोडले जाते. यामुळे पुढील ३५ गावांची शेती बाधित होत आहे. याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या पिकांवर होत आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एकवीरा कृती समितीने लोणावळा नगरपरिषदेला निवेदनाद्वारे दिला आहे.
कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि कामगार नेते भरत मोरे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावले, कार्ला ग्रामपंचायतचे उपसरपंच किरण हुलावळे, माजी सरपंच नंदकुमार पदमुले, गुलाब तिकोने, माजी नगरसेवक निखिल कवीश्वर आदी यावेळी उपस्थित होते.
देहू आणि आळंदी येथील तिर्थक्षेत्रातून इंद्रायणी नदी वाहते. या नदी पवित्र समजून भाविक त्यामध्ये स्नान करतात. लोणावळा नगरपरिषद हद्दीमधून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीत थेट मोठ्या प्रमाणावर मलमूत्र, सांडपाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. या पार्श्वभूमीवर एकवीरा कृती समितीच्यावतीने लोणावळा नगरपरिषदेस निवेदनाद्वारे वरील इशारा देण्यात आला आहे.
समस्या कमी हाईल
लोणावळा नगर परिषदेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समस्या काही प्रमाणात कमी होईल, असे लोणावळा नगरपरिषदेच्या प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र ही समस्या पूर्णपणे सुटेल, अशी खात्री अधिकारी देत नाहीत.