पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव अंतिम टप्प्यात आला आहे. गुरुवारी विसर्जन मिरवणुकीने या दिमाखदार उत्सवाची सांगता होईल. नेहमीप्रमाणे यंदाचा उत्सवही जल्लोषात झाला. लोक उत्साहाने यात सहभागी झाले. रस्त्यांवर यावेळी गर्दीही मोठी दिसली. पुण्याचा गणेशोत्सव काळानुरूप बदल स्वीकारत असतो. त्यात वैविध्य आणण्याचा प्रयत्न करीत असतो. उत्सवाच्या आयोजनात, देखाव्यांमध्येही नावीन्य असते. त्यामुळेच या उत्सवाचा ताजेपणा टिकून आहे. यंदा अनेक मंडळांनी जिवंत देखाव्यांवर अधिक भर दिलेला दिसला.
चौकाचौकात व्यासपीठावरून ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील नाट्यछटा सादर केल्या गेल्या. लोकांनी त्यालाही मोठा प्रतिसाद दिला. सदाशिव पेठेतील नव जवान मित्र मंडळाने एकाच वेळी समोरासमोर दोन भव्य व्यासपीठे उभारून झाशीच्या राणीच्या लढ्याच्या ऐतिहासिक तपशिलासह दिमाखदार नाट्यसंहिता सादर केली. त्याला व्हिज्युअल्सचीही चांगली जोड दिली गेली.
गणेश भक्तांना हा जिवंत देखावा चांगलाच भावला. अशाच प्रकारे अन्यही मंडळांनी जिवंत नाट्यछटा सादर केल्या. त्यामुळे मंडळाच्या परिसरातील कलाकारांना, तरुणांना प्रथमच रंगमंचकीय अनुभव घेता आला. अशा प्रकारातूनही आपल्याला अनेक चांगले कलाकार मिळू शकतील. या उत्सवाचा हाच तर मुख्य हेतू असतो. यंदा महालांच्या स्वरूपातील सेट उभारण्यावरही अनेक मंडळांचा भर दिसला. राजाराम मंडळाने उभारलेला गजानन महाराज मंदिराचा देखणा सेट लोकांच्या कौतुकाचा विषय ठरला होता. यंदा शताब्दी साजरी करणाऱ्या खडकमाळ आळी मंडळाचा गणेश महालाचा देखावाही आकर्षक रंगसंगतीचा ठरला. पुण्याच्या गणेशोत्सवात पुणे फेस्टिव्हलचेही मोठे आकर्षण असते. यंदा या फेस्टिव्हलचे प्रमुख संयोजनपद अभय छाजेडांकडे हस्तांतरित झाले. त्यांनीही या फेस्टिव्हलच्या आयोजनात नेटकेपणा आणला. हा सगळाच उत्सव दिमाखदार पद्धतीने साजरा झाला असला तरी उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी निर्माण झालेले प्रश्न याहीवेळी उपस्थित झाले.
प्रत्यक्ष गणेशोत्सव सुरू व्हायच्या सुमारे महिनाभर आधी पुण्यात ढोल वाजू लागतात. या ढोल पथकांच्या प्रशिक्षणाची ठिकाणे, त्यांच्या वेळा आणि त्यांचे परवाने या विषयीचे प्रश्न याहीवेळी चर्चिले गेले. या ढोल पथकांना उत्सवाच्या सुरुवातीला आणि शेवटच्या विसर्जन मिरवणुकीत मान असतो, पण या पथकांनी आता ऐन उत्सव काळातही मंडळांपुढे जाऊन ढोल बडवायची एक नवी प्रथा अलीकडे मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. त्यामुळे गर्दी हाताळण्याचे नियोजन चुकते आहे. ऐन मध्यवस्तीत ही पथके ढोल वादन करीत असताना रस्त्यावरील गर्दी सुरळीतपणे इकडून तिकडे गेली पाहिजे याकडे लक्ष दिले जात नाही. पथकातले काही कार्यकर्ते हातात दोरी धरून वादकांना सुरक्षित जागा उपलब्ध करून देत असल्याने रस्त्यावरील गर्दीचीही मोठी चेंगराचेंगरी होत असते, तो प्रकार टाळण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर मुख्य उत्सवाच्या आधी रस्त्यावर पडणाऱ्या मांडवांच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित होतात.
मंडळांच्या मांडवांना दिल्या जाणाऱ्या परवान्यांचा विषय उपस्थित होतो. हे सारे विषय पोलिसांकडून किंवा काही दैनिकांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये आवर्जून उपस्थित होत असतात. अशा परवान्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करणे, एकदा दिलेला परवाना पाच वर्षांसाठी ग्राह्य धरणे अशा उपाययोजनांचे पर्याय सुचवले जातात. प्रत्यक्ष उत्सव सुरू झाल्यानंतर मंडळांच्या मांडवांमुळे होणाऱ्या वाहतूक अडथळ्याच्या प्रश्नाकडे कोणाचे फार लक्ष जात नाही. मध्य पुण्यात इतकी मंडळे झाली आहेत की त्यांच्या मांडवांमुळे किंवा रस्त्यापर्यंत आलेल्या देखाव्यामुळे वाहतुकीतील अडथळे दूर होतील अशी अपेक्षाच करता येत नाही. मुळात नेहमीच्या वाढत्या गर्दीला आणि वाढत्या वाहतुकीला मध्य पुण्यातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यात या मांडवांच्या अडथळ्याने गणेशोत्सव काळात मध्य पुण्यातून ये-जा करणे येथील नागरिकांसाठी जिकिरीचे बनू लागले आहे.
त्यावर कितीही बैठका घेतल्या तरी तोडगा निघूच शकणार नाही अशी स्थिती आहे. काही प्रश्नांना उत्तरच नसते त्यातलाच हा प्रकार आहे. उत्सवाला दोन-तीन दिवस झाले की मग विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनाची चर्चा सुरू होते. मिरवणूक लवकर संपवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतील यावर उहापोह होतो. मग मानाचे गणपती, त्यानंतर मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या इतर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती सुरू होतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यावर उपाययोजना सुचवत असतो पण आजवर एकदाही विसर्जन मिरवणूक वेळेवर संपलेली नाही. यंदा दगडूशेठ गणपती साडेचार वाजण्याच्या सुमारालाच मुख्य मिरवणुकीत सामील होणार आहे. त्यांचा हा निर्णय चांगला आहे. बाकीच्या महत्त्वाच्या मंडळांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागतच केले असले, तरी या मंडळांनी त्यांच्या इतके लवकर मिरवणुकीत सहभागी होण्यात असमर्थता दर्शवली आहे.
मंडई मंडळाचे अण्णा थोरात, भाऊ रंगारी ट्रस्टचे पुनीत बालन, बाबू गेनू ट्रस्टचे बाळासाहेब मारणे, जिलब्या मारुती ट्रस्टचे भूषण पंड्या या मंडळ प्रमुखांनी एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन विसर्जन मिरवणुकीबाबत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी दगडूशेठ मंडळाने लवकर सहभागी होण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी आपली मंडळे तितक्या लवकर सहभागी होऊ शकण्यात असमर्थता दर्शवली आहे. म्हणजे याचा अर्थ एकट्या दगडूशेठ मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत लवकर सहभागी होऊन काहीही उपयोग होणार नाही, असाच सारा रागरंग आहे. रस्त्यावर रोषणाईचे गणपती आणण्यासाठी रस्त्यावर अंधार तरी पडला पाहिजे असा सूर काही जणांनी लावला आहे.
दुसरे असे की टिळक चौकातून समाधान चौकापर्यंतचे अत्यंत थोडके अंतर पार करण्यासाठी या महत्त्वाच्या मंडळांना जो प्रचंड अवधी लागतो तो पोलिसांनी कमी करावा असाही प्रस्ताव दिला गेला आहे. मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी या महत्त्वाच्या मंडळांनी सहकार्याचीच भूमिका घेतली आहे त्याचे स्वागतच केले पाहिजे. पण एकूण रागरंग मिरवणूक लवकर आटोपण्याचा नाही हेही तितकेच खरे आहे. या उत्सवातील असे प्रश्न नेहमीचेच असतात, त्यावरील चर्चाही नेहमीच्या स्वरूपातीलच असते, पण मूळ प्रश्न मात्र जागेवरच राहतात त्याचे काय करायचे, हा खरा मुद्दा आहे.