– अभिजित कुलकर्णी
आज भारताने वाहननिर्मितीच्या क्षेत्रात “लायन लीप’ घेतली आहे. भारत सध्या जगातील सर्वात मोठा ट्रॅक्टर उत्पादक, दुसरा सर्वात मोठा बस उत्पादक आणि तिसरा सर्वात मोठा अवजड ट्रक उत्पादक आहे. येत्या काही वर्षांत ई-कारच्या निर्मितीत भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल.
अमेरिकेत एक शहर आहे, डेट्रॉइट, ज्याला अमेरिकेच्या औद्योगिक परिवर्तनाचे श्रेय दिले जाते. याचे मूळ कारण म्हणजे येथे ऑटोमोबाइल उद्योगाची झपाट्याने भरभराट झाली आणि त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळाला आणि यातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालनाही मिळाली. उद्योजक हेन्री फोर्ड यांनी पुढाकार घेतला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त व्यावसायिक वाहनांचीही येथे मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊ लागली. यामुळेच जगभर हे शहर “मोटर सिटी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
ऑटोमोबाइल उद्योगाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कंपन्यांना केवळ चांगला नफाच मिळवून देत नाही, तर मोठ्या संख्येने रोजगारनिर्मितीही करते. या उद्योगाची झपाट्याने वाढ झाल्यामुळे डेट्रॉइटमध्ये उद्योगांसाठी कारखाने उभे करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. जगातील अनेक कार कंपन्यांनी येथे आपले कारखाने उघडले आणि त्यातून येथे नवीन तंत्रज्ञान येत राहिले. परिणामी, पूर्वीपेक्षा चारचाकी अधिक सुंदर, मजबूत आणि वेगवान बनल्या.
भारतामध्ये अगोदर परवाना राज असल्यामुळे आणि दोन-तीन कंपन्यांनाच कार बनवण्याची परवानगी असल्यामुळे हा बदल भारतात उशिरा झाला. साधारणतः 1980च्या दशकात एक नवीन सुरुवात झाली आणि सुझुकी या पहिल्या परदेशी कंपनीला कार बनवण्याची परवानगी मिळाली. यानंतर एकामागून एक कार आणि व्यावसायिक वाहने बनवणाऱ्या कंपन्यांच्या रांगा लागल्या. उत्पादन वाढू लागले आणि रोजगारही वाढला.
नवीन शतकाच्या आगमनानंतर, ऑटोमोबाइल उद्योगाला गती मिळू लागली आणि सर्व कार कंपन्या प्रगत मॉडेलच्या कारसह बाजारात प्रवेश करू लागल्या. परिस्थिती अशी होती की ज्या गाड्या आधी फक्त परदेशात लॉन्च झाल्या होत्या, त्या भारतातही येऊ लागल्या आणि गाड्यांची विक्री सातत्याने वाढू लागली. कार कंपन्यांनी “भारतात कार बनवाव्या’ हे सरकारचे धोरण यशस्वी ठरले. यासाठी विविध राज्यांनी विशेषत: गुजरात आणि तामिळनाडू यांनी त्यांना स्वस्त दरात जमीन देण्यासह इतर अनेक प्रकारच्या सवलती दिल्या.
त्या कंपन्यांना निर्यात प्रोत्साहनही देण्यात आले. त्यामुळे भारत वाहन निर्यात करणारा देश म्हणून जागतिक पटलावर नावारूपाला आला. कारमधील स्पर्धेमुळे देशातील वाहनउद्योगाच्या अर्थकारणाचे आकारमान वाढले. ग्राहकांना भरपूर पर्याय उपलब्ध होऊ लागले. नागरिकांमधील चारचाकींविषयीचे वाढते आकर्षण आणि वाढत जाणारा उत्पन्न स्तर लक्षात घेऊन देशातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बॅंकांनी, तसेच वित्तसंस्थांनी कार आणि दुचाकींसाठी कर्ज देण्यास सुरुवात केली. यामुळे वाहने घेणे सोपे झाले. मागील दोन-तीन वर्षांत सर्वाधिक वाढ ऑटोमोबाइल उद्योगात दिसून आली.
अलीकडेच फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने ऑगस्ट 2023 मध्ये विकल्या गेलेल्या वाहनांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, ऑगस्ट महिन्यात भारतीय वाहन बाजारात वार्षिक आधारावर 8.63 टक्के वाढीसह 18 लाख 18 हजार 647 वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 16 लाख 74 हजार 162 वाहनांची विक्री झाली होती. तीनचाकी वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक 66.15 टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात देशात एकूण 60,132 तीनचाकी वाहनांची विक्री झाली आहे.
आता इलेक्ट्रिक मोटारींच्या निर्मितीमध्ये आणि तंत्रज्ञानात सातत्याने होत असलेल्या सुधारणांमुळे भारतीय वाहनउद्योगाला नवे पंख लाभले आहेत. चालू वर्षांत भारतात एकूण 29 लाख मोटारींचे उत्पादन केले जाईल अशी शक्यता असून 2030 पर्यंत हा आकडा तीन कोटींवर जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीमध्ये ज्या वेगाने भारताने बाजी मारली आहे, ती निश्चितच उल्लेखनीय आहे. टाटा मोटर्सने याची सुरुवात केली आहे आणि आता प्रत्येक ऑटोमोबाइल कंपनी इलेक्ट्रिक कार बनवण्याची किंवा बनवण्याच्या तयारीत आहे. टेस्ला सारख्या कार कंपन्यांनीही भारतात कार बनवण्याचे मान्य केले आहे.
याबाबतची एक मोठी उपलब्धी म्हणजे आता जड वाहतुकीतील महत्त्वाचे वाहन असणारे ट्रकही इलेक्ट्रिक ऊर्जेवर धावणार आहेत. याचा देशाच्या अर्थकारणाला मोठा फायदा होणार आहे. कारण, यामुळे देशाचे पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीचे बिल लक्षणीयरीत्या कमी होईल. परिणामी, चालू खात्यावरील तूट कमी होण्यास मदत होईल. देशाच्या जीडीपीला चालना देण्यात ऑटोमोबाइल उद्योगाचे मोठे योगदान असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये ते 7.1 टक्के आणि उत्पादन जीडीपीमध्ये 49 टक्के योगदान या क्षेत्राचे आहे. सद्यस्थितीत वाहनउद्योग सुमारे दोन कोटी लोकांना रोजगार देत आहे. हीच गती कायम राहिल्यास वाहन उद्योग 2030 पर्यंत पाच कोटी रोजगार देऊ शकेल.
भारत सध्या जगातील सर्वात मोठा ट्रॅक्टर उत्पादक, दुसरा सर्वात मोठा बस उत्पादक आणि तिसरा सर्वात मोठा अवजड ट्रक उत्पादक आहे. येत्या काही वर्षांत ई-कारच्या निर्मितीच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल, असे आकडेवारीवरून दिसून येते. इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात झालेली वाढ आणि त्यांच्या किमतीत झालेली घसरण हे कार विक्री वाढण्याचे प्रमुख कारण असेल. येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांमुळे देशात नवी ऑटोमोबाइल क्रांती होईल यात शंका नाही.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे वाहनउद्योगात सातत्याने क्रांती घडवण्यासाठी आग्रही दिसून येताहेत. हायड्रोजन कार आणि पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी कार, इलेक्ट्रिक डबल डेकर बस यांसारख्या नवनवीन आविष्कारांवर त्यांचा भर आहे. भारताच्या इथेनॉलक्रांतीची दखल जी20च्या बैठकीतही घेतली गेली. पर्यायी इंधनाच्या अधिकाधिक वापरातून शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने भारताची सुरू असलेली वाटचाल इतर गरीब आणि विकसनशील देशांसाठी आदर्श ठरणारी आहे.