बंगळूरू – अग्निपथ योजना ही भारतीय लष्कराचा ताबा मिळवण्यासाठीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा आहे, असा खळबळजनक दावा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. यामुळे अग्निवीर सेवेत असताना आणि सेवा समाप्त झाल्यावरही संघाचे कार्यकर्ते होतील असा दावाही कुमारस्वामी यांनी केला आहे.
एका मुलाखतीत कुमारस्वामी म्हणाले की साधारण 10 लाख जणांची या योजनेतून भरती केली जाणार आहे. कदाचित संघाचे कार्यकर्तेही या माध्यमातून लष्करात घुसवले जाऊ शकतात. या अग्निवीरांची भरती संघ करणार आहे की भारतीय लष्कर?ते 2.5 लाख जणांना लष्करात ठेवतील मात्र 11 लाख रूपये देऊन ज्या 75 टक्के लोकांना चार वर्षांनी बाहेर काढले जाईल ते देशभर पसरतील हा त्यांचा छुपा अजेंडा आहे. जे लष्करात राहतील आणि जे बाहेर जातील ते संघाचेच लोक असणार आहेत. भारतीय लष्करावर ताबा मिळवण्याची ही त्यांची तयारी सुरू आहे. संघाची स्थापना हिटलरच्या नाझी राजवटीच्या काळात झाल्याचे नमूद करून ही आरएसएसची अग्निपथ असल्याचे कुमारस्वामी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की कदाचित त्यांना म्हणजे संघाला देशात नाझी राजवट आणायची असावी. बऱ्याच गोष्टींवर वाद होऊ शकतात. काही गोष्टींबाबत मला शंका आहेत.
कुमारस्वामी यांना प्रत्युत्तर
कुमारस्वामी यांचे हे वक्तव्य अत्यंत धक्कादायक आणि बोगस असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी दिली आहे. ते भाजप अथवा संघाला उद्देशून नाही, तर भारतीय लष्कर आणि सशस्त्र दलांना उद्देशून असल्याचे त्यांनी नमूद केले. लष्कर आणि देशाच्या अन्य महत्वाच्या संस्था अशी त्यांच्याबाबत तडजोड करू देतील का, असा प्रश्न उपस्थित करत पुनावाला म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 च्या बालाकोट स्ट्राइकवर याच लोकांनी शंका उपस्थित केल्या होत्या. कुमारस्वामी यांनी जे विधान केले आहे तो भारतीय लष्कराचा आणि प्रतिष्ठित संस्थांचा अपमान आहे.