कराड – सातारा -प्राथमिक शिक्षक बॅंकेत गेल्या काही वर्षात सभासदांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागण्यांचा तर सत्ताधाऱ्यांना पुरता विसर पडला. आता निवडणूक आल्याने त्यांना सेवानिवृत्तांचा पुळका येत आहे. सभासद परिवर्तन पॅनेलच्या विजयासाठी सेवानिवृत्त शिक्षकांचा सक्रिय सहभाग असून शिक्षक बॅंकेचे वाटोळे करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन शिक्षक बॅंकेचे माजी संचालक व सेवानिवृत्त संघटनेचे तालुकाध्यक्ष हिंदुराव भोसले यांनी केले.
सभासद परिवर्तन पॅनेलचे कोरेगाव गटातील उमेदवार नितीन शिर्के, सुरेश पवार व इतर मागास प्रवर्गातील उमेदवार किरण यादव यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात श्री. भोसले बोलत होते. यावेळी यावेळी सुदाम खरात, शिवाजीराव साळुंखे, आर. टी. कदम, वसंत जाधव, शांताराम लेंभे, शामराव यादव, ज. ग. माने, शिवाजीराव माने, हनुमंतराव माने, तानाजी जाधव, राऊत गुरुजी, संतोष मांढरे, अनिल कदम, विजय जाधव, रामराव बर्गे, तानाजी नावडकर, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. हिंदुराव भोसले म्हणाले, “सभासदांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली बॅंक टिकावी यासाठी सभासद परिवर्तन पॅनेलची स्थापना झाली आहे.
या पॅनेलचा धसका बॅंकेच्या सत्ताधाऱ्यांनी घेतला असून त्यांना आता पराभव दिसू लागल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार स्वच्छ प्रतिमा असणारे आहेत. सत्ताधाऱ्यांनी मागील पाच वर्षात बरेच उद्योग केल्याने मतदारांनी त्यांना पुरते झिडकारले आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या सर्व जागा मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असून यात सेवानिवृत्त शिक्षकांचा सक्रिय सहभाग असणार आहे.” किरण यादव म्हणाले, “बॅंकेत पाच वर्षात अतिशय चुकीचा कारभार झाला. संचालकपदाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी आवाज उठवला. अनेकदा सभासदहिताचा, सेवानिवृत्तांच्या मागण्यांबाबत आम्ही पाठपुरावा केला. मात्र, बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभार केला.
सभासदहितापेक्षा त्यांनी स्वहित जोपासल्याने शिक्षकांमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल प्रचंड चीड आहे. या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने सत्ताधाऱ्यांनी सभासदांची दिशाभूल करणे सुरु केले आहे. मात्र, अशा फसवेगिरीला आता सूज्ञ सभासद भुलणार नाहीत.’ यावेळी सुदाम खरात, शिवाजीराव साळुंखे आदींनी मनोगत व्यक्त करुन परिवर्तन पॅनेलला मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, ल्हासुर्णे, कोरेगाव, रहिमतपूर, वाठार, पिंपोडे या विभागात सेवानिवृत्त शिक्षक प्रचार यंत्रणा राबवित आहेत.शिक्षकांकडून पैसे उकळाउकळी करणाऱ्या, एजंटगिरी करणाऱ्या त्रिकुटाने आमचे नेते संभाजीराव थोरात यांच्याबाबत बोलू नये. तेवढी तुमची उंची नाही, अशी खरमरीत टीका सभासद शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष व शिक्षक बॅंकेचे माजी संचालक विक्रम डोंगरे यांनी केली.
प्राथमिक शिक्षक बॅंक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते कराड येथे बोलत होते. प्रदीप घाडगे, महेंद्र जानुगडे व वसंतराव हारगुडे यांनी कराडमध्ये प्रचार करताना संभाजीराव थोरात याच्याबद्दल वक्तव्य केले होते. वास्तविक श्री. थोरात राज्याचे नेतृत्व करतानासुद्धा नेहमीच जमिनीवरच राहिले आहेत. ते कधी हवेत गेले नाहीत, असे सांगून श्री. डोंगरे म्हणाले, “राज्यातील शिक्षक नेहमीच श्री. थोरात यांच्याबरोबर राहिले आहेत. घाडगे, जानुगडे, हारगुडे यांची त्यांच्यावर बोलण्याची अजिबात पात्रता नाही. त्यांनी एकदा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करावा, म्हणजे त्यांना त्यांची पात्रता कळेल. जानुगडे व हारगुडे यांना ते चांगले माहित आहे.
महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षक संघाची अस्मिता जपण्याचे व ती वाढवण्याचे काम कै. शिवाजीराव पाटील यांच्यानंतर संभाजीराव थोरात यांनीच केले आहे, याला महाराष्ट्रातील तमाम शिक्षक साक्षीदार आहेत. श्री. थोरात यांना तीन वेळा संघाचे अध्यक्ष केले ते मेहरबानकी म्हणून नव्हे तर त्यांचे संघटनकौशल्य व कर्तृत्वच तसे होते. आमची आजची युती अनैसर्गिक असल्याचे ते म्हणतात, मग कै. शिवाजीरावांचे चिरंजीव माधवराव पाटील नुकतेच सांगली शिक्षक बॅंकेत समितीबरोबर गेले हे कुठल्या नैतिकतेत बसते? ही नैतिकता तुम्हाला शोभते का? असा सवाल करून विक्रम डोंगरे म्हणाले,
“माधवराव पाटील यांचा संघाशी संबंध काय ते तपासून थोरात यांच्याविषयी बोलावे. ते स्वतः माध्यमिक शिक्षक असून निवृत्तीनंतर संघात आले. तात्विक मतभेदांमुळे संघाचे सभासद कै. शिवाजीराव पाटील यांच्यापासून दुरावले व नेतृत्व संभाजीराव थोरातांकडे आले. हे नेतृत्व कर्तृत्वामुळे आले, हे यानंतरच्या राज्यस्तरीय मेळाव्यांनी सिद्ध केले आहे. शिर्डी व रत्नागिरीतील मेळाव्यात तर महेंद्र जानुगडे व वसंतराव हारगुडे हेही संभाजीरावांबरोबर होते.
तथापि, याचे भान न ठेवणे कितपत योग्य आहे?” संभाजीरावांनी शिवाजीरावांशी गद्दारी केली म्हणणाऱ्या विरोधकांनी हे समजून घ्यावे. गद्दारी केली असती तर अधिवेशनाला लाखोंनी शिक्षक आले नसते. हिम्मत असेल तर त्यांनी आज राज्यातील नेत्यांना एका व्यासपीठावर बोलवावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
गवताच्या गंजीवर बसलेल्यांनी भांडण करू नये
गवताच्या गंजीवर बसलेल्यांनी काडेपेटीवाल्याशी भांडण करू नये, हे साधे गणित आपल्याला कळत नसेल तर येत्या 19 तारखेला सभासद शिक्षक मतदानातून दाखवून देतील. त्यानंतर बॅंकेत तुम्ही पाय ठेवण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा प्रतिप्रश्नही श्री. डोंगरे यांनी उपस्थित केला.