शहरात परतणाऱ्यांची गर्दी : अनेक विभागातून येताहेत जादा बसेस
पिंपरी – दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत. त्यामुळे, परतीच्या मार्गावर असलेल्या प्रवाशांनी मोठी गर्दी शहरात येत असताना दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात विविध आगारातून येणाऱ्या बसगाड्या पुन्हा भरुन येताना दिसत आहेत. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने माहामंडळाच्या अनेक विभागातून या मार्गावर जादा बस सोडल्यामुळे वल्लभनगर आगारातही जादा बसची गर्दी पहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील विविध भागातील अनेक जण नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे, शहरातील हे नागरिक दिवाळीच्या सुट्टीला आपल्या मूळ गावी गेले होते. त्यामुळे, दिवाळीच्या अगोदर काही दिवसांपूर्वीच एसटी बस, रेल्वे आणि खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्सचे बुकींगही फुल्ल झाले होते. याचाच फायदा खाजगी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीने घेतला होता. आता दिवाळीचा सण संपल्यानंतर गावी गेलेले नागरिक परतीच्या प्रवासाला लागले आहेत.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून वल्लभनगर आगारासह विविध भागातील आगारांनी जादा बसगाड्याचे नियोजन केले आहे. मात्र, तरीही राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या खचाखच भरुन येत आहेत. वल्लभनगर आगारात वेगवेगळ्या मार्गावर सुमारे 50 बस जादा सोडल्या आहेत. दिवाळीनंतर परतीच्या प्रवासासाठी 5 नोव्हेंबर पर्यंत या जादा बस सोडण्यात येणार आहेत. वल्लभनगर आगारात सध्या मुंबई, पुणे, कोल्हापुर, सांगली, सातारा, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, बीड या ठिकाणाहून येणाऱ्या बसगाड्यांमध्ये मोठी गर्दी होत आहे.