आंदोलनकर्ते प्राधिकरणाच्या इमारतीवर चढले
सोनई-करजगावची पाणी योजना होणार चार दिवसांत कार्यान्वित
नगर – नेवासा तालुक्यातील बंद पडलेल्या सोनई करजगावसह अठरा गावाच्या पाणी योजनेसंदर्भात मंगळवारी (दि.23) रोजी माजी आ. शंकरराव गडाख यांच्या आक्रमक आंदोलना पुढे महाराष्ट्र जीवन प्राधिकारणच्या अधिकाऱ्यांनी लोटांगन घेत चार दिवसात ही योजना कार्यान्वित करण्याचे लेखी आश्वासन दिले.
दरम्यान प्राधिकरणचे नाशिकचे मुख्य अभियंता लांडगे यांच्याशी गडाख यांची भ्रमणध्वनीव्दारे सविस्तर चर्चा केली. योजनेचे राहिलेले अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी लवकरच नासिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्यासमवेत गडाख व सर्व गावातील सरपंचाची बैठक घेण्याचे आश्वासन लांडगे यांनी दिले. तसेच राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी, उंबरे व पिंप्री येथील अनाधिकृत नळ जोडणी बंद करण्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे लेखी गडाख यांना देण्यात आले.
सोनई करजगावसह अठरा गावाच्या पाणी योजना तातडीने सुरू व्हावी, योजना सुरु होण्यापर्यंत या सर्व गावात पाण्याचे टॅंकर चालू करावेत. कामे पूर्ण झाली नसतांना ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करावी, या मागणीसाठी माजी आ.गडाख यांच्या नेतृत्वाखाली हजारो ग्रामस्थांनी नगरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ऑफिस समोर उपोषण केले. 1 जुलैपासून ही योजना बंद आहे. योजना सुरू व्हावी, यासाठी गडाख यांच्या समवेत अठरा गावचे सरपंच व ग्रामस्थांनी सोनई येथे रस्तारोको आंदोलन केले. त्यावेळी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लेखी देत योजना सुरू करण्याचे आवश्वास दिले होते. मात्र, त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे मंगळवारी नगरला प्राधिकरण्याच्या योजनेतील गावातील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी भजन कीर्तन करत प्राधिकरणाचा निषेध नोंदविला. तर प्राधिकरणाचे लक्ष वेधण्यासाठी काही तरूण प्राधिकाऱ्यांच्या बिल्डींगवर चढले. ही बाब पोलीसांना कळताच शहरपोलीस उपअधीक्षक संदीप मिटके मोठ्या फौजफाट्यासह त्या ठिकाणी आले. यावेळी गडाख अधिकाऱ्यांची खरडपट्टीत काढत होते. प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी बी.ए.अहिरे, स्वत: माजी गडाख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सदस्य सुनील गडाख यांच्या अधी चर्चा झाली. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, उमेश परहर, सदस्य के. आर. कातोरे, संदेश कार्ले, अनिल कराळे यांनी देखली या ठिकाणी भेट दिली. यावेळी गडाख यांनी प्राधिकरण्याच्या अधिकाऱ्यांची पोलखोल केली.
अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना वेगळी माहिती देतात आणि आमच्या सोबत वेळी चर्चा करतात. आता आश्वासन नको पाणी कधी सुरू करणार असा आक्रमक पवित्रा घेतल्याने कार्यकारी अधिकारी अहिरे यांना चांगलाच घाम फुटला. पाणी योजनेचे दहा टक्के आम्ही भरले आणि फुकटचे पाणी राहुरी तालुक्यातील गावे आणि ढाब्यांना, आम्ही पाणी मागितले, तर आमच्यावर गुन्हे दाखल करता आणि कामे अपूर्ण असतांना योजनेच्या ठेकेदाराला निधी कसा दिला, असा सवाल उपस्थित करत अपूर्ण योजनेच्या दुरूस्तीसाठी सरकारकडे निधी मागणाऱ्या प्राधिकरण्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्ह दाखल करण्याचा दमच भरला.
राहुरी तालुक्यातील गावांना पाणी देण्याचे लेखी आदेश नसतांना पाणी दिलेच कसे असा सवाल उपस्थित केला. सदस्य सुनील गडाख यांनी प्राधिकरणाच्या कामावर प्रश्न उपस्थित केला. अखेर नाशिकच्या मुख्य अभियंत्यांशी चर्चा झाल्यानंतर आहिरे यांनी येत्या चार दिवसांत पाणी योजना सुरू करण्याचे आश्वासन गडाख यांना दिले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनई येथे उदयन गडाख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषण केले.