सातारा (प्रतिनिधी) – कराड तालुक्यातील हणबरवाडी येथे चार जणांकडील 12 कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तेथील सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्रतिबंध नियंत्रण अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार हणबरवाडीपासून दहा किमी त्रिज्येतील क्षेत्र सतर्क भाग म्हणून जाहीर केले आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. परिहार व अन्य अधिकाऱ्यांनी गावात भेट दिली.
हणबरवाडी येथे चार जणांकडील दहा कोंबड्या आधी मृत्युमुखी पडल्या. त्यानंतर काल (दि. 16) आणखी दोन कोंबड्या दगावल्या. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, तालुका सहाय्यक डॉ. बोर्डे, पंचायत समितीचे पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ. उंडेगावकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. के. कोकरे यांनी गावात भेट दिली.
कोबंड्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे डॉ. कोकरे यांनी सांगितले. या घटनेमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दहा किमी त्रिज्येचा परिसर प्रभावित क्षेत्र घोषित करून विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रभावित क्षेत्रात वाहनांची ये-जा करण्यास मनाई असून, तेथील खासगी वाहने प्रभावित क्षेत्राच्या बाहेर लावावीत.
जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली असून, प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचाली, इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध आहे. तेथील पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर सोडियम हायड्रोक्साइड किंवा पोटॅशियम परमॅंग्नेटने निर्जंतुक करावा. प्रभावित पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांच्या सर्व नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात.
दगावलेल्या पक्ष्यांच्या रोगाचे निदान झाल्याचा अहवाल येईपर्यंत प्रभावित क्षेत्राच्या दहा किमी त्रिज्येच्या परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार, यात्रा, प्रदर्शन या बाबी बंद राहतील. या आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे निर्देश शेखर सिंह यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.