नवी दिल्ली – बिहारच्या अररिया जिल्ह्यात एका पत्रकाराची निर्भीड हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्या पाठोपाठ त्रिपुरातही एका पत्रकारावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या दोन घटनांमुळे पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
बिहारच्या अररिया जिल्ह्यातून एका पत्रकाराच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. राणीगंजमध्ये एका वृत्तपत्राच्या पत्रकाराची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी पत्रकाराच्या घरात घुसून गोळ्या झाडल्या. गोळी लागल्यानं पत्रकार विमल कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. भावाच्या खून खटल्यातील तो एकमेव साक्षीदार होता. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
विमल कुमार यादव यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. पत्नी पूजा देवी यांनी सांगितले की, सकाळी घराचा दरवाजा ठोठावून पतीच्या नावाने आवाज देण्यात आला. दोघांनी उठून घराचा दरवाजा व ग्रील उघडले. त्यानंतर विमल कुमार हे मुख्य गेट उघडून दरवाजाजवळ पोहोचताच गोळी झाडल्याचा आवाज आला. विमल कुमार यांचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने त्या दिशेने धाव घेतली तर विमल कुमार हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना गोळीबाराची माहिती दिली. परंतु, पहाट असल्याने फारसे लोक घराबाहेर नव्हते.
दुसरीकडे त्रिपुरात आणखी एका पत्रकारची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. सुदीप दत्ता भौमिक असे मृत पत्रकाराचे नाव असून त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या (टीएसआर) जवानाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आगरतळा येथून 20 किमी अंतरावर असलेल्या आरके नगर येथे ही घटना घडली.