मुंबई : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अखेर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. ईडीकडून अनिल देशमुख यांना 13 तासांच्या चौकशीनंतर अटककारण्यात आली आहे. दरम्यान, देशमुख यांच्या अटकेच्या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाटीवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी यावेळी अनिल देशमुख यांच्यानंतर आता महाविकास आघाडीच्या अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचे म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर एक व्हिडीओ ट्विट केले असून यात खोचक सवाल केला आहे. यात त्यांनी “वसूली झालेले 100 कोटी कोणाच्या खात्यात कसे गेले? याची देखील माहिती लवकरच बाहेर येईल, असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले आहे. तर अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर आहे असेही ते म्हणाले आहेत.
At last Home Minister #AnilDeshmukh is arrested by ED. More than ₹100 Crores Non Transparent Transactions. Cash Trail
Next will be #AnilParab
अखेर ठाकरे सरकारचे गृहमंत्री #अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. ₹100 कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार.
अनिल देशमुख नंतर अनिल परब pic.twitter.com/SN2Tek9Q7n
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 1, 2021
अनिल देशमुख यांना अखेर 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली.
अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर रात्री 3 वाजेपर्यंत अनिल देशमुख हे त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्याशी चर्चा करत होते. रात्री 3 वाजताच्या दरम्यान वकील इंद्रपाल हे देखील ईडी कार्यालयामधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी आपण या अटकेला न्यायालयात विरोध करणार आहोत, अशी माहिती दिली. आज सकाळी 10 वाजता देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल, तिथून ठीक 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.