पुणे – राज्यात इयत्ता अकरावीचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, प्रवेश प्रक्रिया दोन महिन्यांपासून ठप्प आहे. केवळ पहिली फेरी पूर्ण झाली असून हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचा तिढा लवकर सोडण्याची मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. या प्रवेश प्रक्रियेत सुमारे 17 लाख विद्यार्थी असून, त्यापैकी 11 लाख प्रवेश झाले आहेत.
प्रवेश घेतलेले व इच्छुक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावीचे वर्ग ऑनलाइन सुरू केले आहेत.
परंतु, प्रवेश प्रक्रिया पुढे सरकत नसल्याने प्रवेश नेमका कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयात होणार याची माहितीच विद्यार्थ्यांना नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.