सातारा – दहा किंवा दहा वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच तालुक्यात सेवा केलेल्या ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्या जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केल्या आहेत. एक विस्तार अधिकारी, 14 ग्रामविकास अधिकारी, 75 ग्रामसेवक, अशा 90 जणांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या असून, 16 विनंती व आपसी बदल्या झाल्या आहेत.
विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांच्या बदल्या सोमवारी सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झाल्या. विनय गौडा, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे उपस्थित होत्या. काही ग्रामसेवक विशिष्ट गावांत, एकाच तालुक्यात जास्त काळ कार्यरत आहेत. राजकीय हस्तक्षेपातून त्यांच्याकडून पक्षपात होत असल्याच्या तक्रारी होत्या.
त्यामुळे प्रशासकीय बदल्या करण्याचा निर्णय गौडा यांनी घेतला होता. समुपदेशनाने बदली प्रक्रिया राबवण्यात आली. एक विस्तार अधिकारी, 14 गामविकास अधिकारी, 75 ग्रामसेवकांच्या प्रशासकीय, दोन विस्तार अधिकारी व सहा ग्रामसेवकांच्या विनंती, दोन ग्रामविकास अधिकारी व सहा ग्रामसेवकांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या. समानीकरणानुसार पदे भरण्यात आल्याची माहिती अर्चना वाघमळे यांनी दिली.
“कही खुशी कही गम’
विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्या बरीच वर्षे झाल्या नव्हत्या. अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच तालुक्यात, एकाच गावात कार्यरत होते. काही कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी झाल्या होत्या. अखेर प्रशासकीय बदल्या करण्याचा धाडसी निर्णय घेऊन विनय गौडा यांनी त्याची अंमलबजावणीही केली. यामुळे तळ ठोकून बसलेल्या ग्रामसेवकांमधून नाराजी व्यक्त होत आहे, तर सर्व कर्मचाऱ्यांना गौडा यांनी समान न्याय दिल्याची भावनाही कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.