पिंपरी – पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ आयोजित केलेल्या आदित्य संवाद कार्यक्रमात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राजकीय प्रश्नांना बगल देत युवा, बेरोजगारी, शिक्षणपद्धती, आरोग्य, स्त्री-सुरक्षा, महाविद्यालयातील रॅगींग यासह अनेक मुद्यांवर चर्चा केली. लोकसभेच्या ऐन रणधुमाळीत आदित्य ठाकरे यांनी युवकांच्या मुलभूत प्रश्नांवर केलेली मनमोकळी चर्चा आणि तरुणांच्या प्रश्नांना दिलेली दिलखुलास आणि तितकीच जबाबदार उत्तरे यामुळे आदित्य ठाकरे यांच्यातील एका जबाबदार युवा नेत्याची ओळखच शहरवासियांना झाली.
आज (बुधवारी) आदित्य संवाद या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरीत करण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीचे महत्त्व, शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असले तरी ठाकरे यांनी राजकारणाला बगल देत युवकांच्या प्रश्नांनाच शेवटपर्यंत प्राधान्य देत परस्पर विरोधी राष्ट्रवादी अथवा त्यांच्या उमेदवारांवर टीका करण्याकडे दुर्लक्ष केले. या कार्यक्रमासाठी उपस्थितांकडून प्रश्न मागविण्यात आले होते. शहरातील स्थानिक प्रश्नांसह राज्य पातळीवरील तसेच राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांचा त्यामध्ये समावेश होता. महाविद्यालय असो, नौकरीच्या मुद्यावरून आलेला प्रश्न असो अथवा जम्मू काश्मिरच्या विषयावरील प्रश्न असो या प्रत्येक प्रश्नाला ठाकरे यांनी राजकीय रंग न देता उत्तरे दिली. अत्यंत समपर्क आणि वस्तुस्थितीजन्य उत्तरे देणाऱ्या आदित्य यांनी उपस्थितांची मने जिंकली.
बीआरटी, शास्तीकर, अनधिकृत बांधकाम, पाणी प्रश्नाची देखील जाण असल्याचे सांगतानाच शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचेही सांगण्यास ते विसरले नाहीत. बैलगाडा शर्यती सुरू करण्यास शिवसेना कटीबद्ध असल्याचे वचनही त्यांनी यावेळी दिले. युवकांनी अधिकधिक प्रगल्प होण्याचे आवाहन करतानाच कोणत्याही महाविद्यालयास काही प्रश्न असल्यास अथवा अन्याय होत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करतानाच पेपर पुर्नतपासणीमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे मत मांडले.