कराड – माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धडकी भरणे स्वभाविक आहे; परंतु सभास्थळी दगडफेक करणे, हा मार्ग होऊ शकत नाही. विचारांच्या लढाईला विचारांनीच उत्तर द्यायला हवे. त्यांनी एक सभा घेतली, तर तुम्ही दोन सभा घ्या. मात्र, दगडफेकीसारखी घटना निंदनीय आहे, असे मत माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी मंजूर झालेल्या एक कोटी 33 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी झाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. आ. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द वादग्रस्त होती. ते एका राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना संविधानिक पदावर राहण्यात रस नव्हता. त्यांना पुन्हा सक्रिय राजकारणात जायचे होते. वादग्रस्त विधाने केल्यावर आपल्याला परत बोलावतील, असे त्यांना वाटत असावे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी वेळोवेळी केली होती; परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटले, तेव्हा कोश्यारींना परत बोलावले. राज्याला नवीन राज्यपाल मिळाले, ते चांगले झाले. कोश्यारी अनावधानाने नव्हे, तर ठरवून बोलत होते, असे वाटते. पश्चिम बंगाल, केरळ आणि तमिळनाडूतही तेथील राज्यपालांच्या वक्तव्यांवरून वाद झाले होते. महाराष्ट्रातही तेच झाले; परंतु उच्चपदस्थ व्यक्तींनी विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचा केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.