निलेश राणे ः सुरक्षा व्यवस्थेवरून साधला निशाण
मुंबई : शिवसेना आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा हटवून त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. त्यामुळे वरळीचे आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य आता झेड दर्जाच्या सुरक्षाव्यवस्थेत फिरणार आहेत. आदित्य ठाकरे कोण आहे. त्याचे महाराष्ट्रात काय योगदान? तो ठाकरे आडनावामुळे पहिली निवडणूक जिंकला, अशी घणाघाती टीका राणेंचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे एक 27 -28 वर्षांचा पोरगा आहे. त्याचे महाराष्ट्रात योगदान काय? ठाकरे आडनावामुळे तो पहिली निवडणूक जिंकला. यापलीकडे त्याचे नेमकं योगदान काय?, असा प्रश्नही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.
मीही एका माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे. माझे वडीलही मुख्यमंत्री होते. मात्र झेड दर्जाच्या सुरक्षा मिळण्यामागे काही तरी पार्श्वभूमी असावी लागते. मात्र आदित्यला ती मिळण्यामागे काय पार्श्वभूमी आहे. आदित्य ठाकरेंचे योगदान नेमकं काय? तो राजकारणात नसल्याने कोणाचे नुकसान होणार आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
झेड दर्जाच्या सुरक्षा आदित्यला देण्याचे नेमकं कारण काय? त्यांना कोणाकडून धोका आहे. कोणी त्याला धमकी दिली आहे का? किंवा त्यांनी कोणाला धमकी दिली आहे. मग त्यांनी काही आंदोलन केले आहे किंवा असा काही विषय हाताळला आहे. ज्यामुळे लोक त्यांच्या मागे पडले नेमकं अस काय घडलं आहे का? हेच मला काही कळत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मी माजी मुख्यमंत्राचा मुलगा आहे. मला कधीही झेड दर्जाच्या सुरक्षा नव्हती. अमित देशमुख यांनाही कधी नव्हती. मग आदित्य ठाकरेंना का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.