मुंबई – महाराष्ट्रात काल (दि. 24) शनिवारी अनेक ठिकाणी पाऊस बरसला. मुंबईतही काल मुसळधार पाऊस झाला. मात्र पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते.
मात्र मुंबईतील या पावसाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. “पाऊस झाला त्याचे स्वागत करा, पाणी साचल्याची तक्रार का करता?’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठा मंदिर अमृत महोत्सवानंतर 24 जून रोजी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, “आज पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि आपण सगळे त्याचं आनंदाने स्वागत केले पाहिजे.
गेले अनेक दिवस आपण पावसाची आतुरतेने वाटत पाहत होतो. आज पाऊस चांगला सुरू झाला आहे. राज्यभर पेरण्या झाल्या आहेत. आजचा पाऊस शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे. पाऊस झाल्याने सर्वांना मनापासून आनंद झाला आहे…’ असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले आहे.
दरम्यान, आता मुख्यमंत्र्याच्या या अजब विधानाचा आदित्य ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतल्याचं दिसून आलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, “मुंबईकरांनी पावसाचे स्वागत केले. पण मुंबईत अशा ठिकाणी पाणी तुंबल, जिथे यापूर्वी कुठेच तुंबल नाही. मुंबईकर म्हणून मला एका वक्तव्याचा राग आहे.
ते वक्तव्य मुख्यमंत्र्यांचे आहे. “पाऊस आल्याचे स्वागत करा. मुंबईत पाणी तुंबलय याची तक्रार काय करता”, हे वक्तव्य म्हणजे निर्लजपणाचं, नाकर्तेपणाचे आणि भ्रष्टाचाराचा कुठला चेहरा असेल तर ते हे खोके सरकार आहे.’ अशी खोचक टीका ठाकरेंनी यावेळी केली.