मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत संजय राठोड यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याप्रकरणी आता शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला याबाबत अद्याप माहिती नाही, पुर्णपणे माहिती घेऊन यावर बोलेन, अशी सावध प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. रत्नागिरीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महंमदवाडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चौकशी होऊ द्या असं म्हटलं होतं.
या प्रकरणातील ऑडियो क्लिप सध्या माध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड हेच पुजा चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी पूर्णपणे माहिती घेऊनच आपण प्रतिक्रिया देऊ असं म्हटलं आहे.