मुंबई – पोलिसांवर सत्ताधाऱ्यांकडून दबाव येतोय, अशी हाकाटी पिटत सोशल मीडियातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जाऊन पोलिसांना तेच तपासाची दिशा देतात अशी हाकाटी पिटली जाऊ लागली.
राज्यातील परिस्थितीवर कोरडे ओढण्यासाठी टपून बसलेल्या भाजपालाही आयते कोलीत मिळाले. त्यांनीही आदित्य ठाकरेंचे नाव न घेता शिवसेनेचा युवा नेता पोलिसांना तपास करू देत नाही. सुशांतने आत्महत्या केली नाही, तर त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला.
विरोधकांच्या या वक्तव्यानंतर सरकार, शिवसेनेकडून कोणीच काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. सर्वचजण पोलीस तपासांतून काही निष्पन्न होते का? याची वाट पाहात राहिले. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तर या आत्महत्येविषयी मिठाची गुळणी घेऊन गप्प राहणे पसंत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या कृतीवर नाराज असल्याचे वृत्त थडकूनही त्यांच्या वतीने खुलासा करण्यात आला नाही.
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुशांतची हत्या व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे भाजपाची प्रचाराची भूमिका नाही, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भाजपाने कोणाही मंत्र्यांचे वा नेत्याचे नाव घेतले नाही, असाही खुलासा त्यांनी यावेळी केला.
तरीही सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जावा की बिहार पोलिसांना अधिकचा तपास करण्यास मुभा द्यावी, यावरील याचिकेची सुनावणी प्रलंबित आहे. हा तपास सीबीआयकडे गेल्यास केवळ नाव गोवण्यात आले म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे सीबीआयचे अधिकारी चौकशी करू शकतात. तसेच ही चौकशी तीन-चार महिन्यापर्यंत चालणार असून बिहारच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे व शिवसेनेवर जबरदस्त चिखलफेक केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सुशांतच्या आत्महत्येस हत्येचे स्वरूप देऊन बिहारचे पोलीस तपासासाठी मुंबईत धाडणाऱ्या जेडीयू-भाजपा युतीचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याही पुत्राचा यात कालपासून संबंध जोडण्यात आला आहे. तेव्हा या निवडणूक प्रचारांसाठी रणधुमाळी माजविणाऱ्या सुशांतच्या आत्महत्येच्या रहस्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.