सोनिया गांधी यांनीही केली नाराजी व्यक्त
नवी दिल्ली – केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम हटवण्याचा प्रस्ताव संसदेत मांडल्यापासून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने त्याच्याविरोधात भूमिका घेतली आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना संयुक्त राष्ट्रांकडे काश्मीर प्रश्न प्रलंबित असताना तो अंतर्गत प्रश्न कसा काय होऊ शकतो, असा सवाल केला.
मात्र, अधीर रंजन चौधरींच्या या वक्तव्यावर कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, मी सरकारकडून स्पष्टीकरण मागत होतो, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असा दावा चौधरी यांनी केला आहे.
दरम्यान, या वादावर स्पष्टीकरण देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, याच संसदेत 1994 मध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पाकव्याप्त काश्मीरला भारतात सामावून घेण्यासाठी ठराव पारीत करण्यात आला होता. मात्र आज पीओके कुठे आहे. मी सरकारकडे याची विचारणा केली. त्यात चुकीचे काय आहे. आज काश्मीरकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. जर काश्मीर प्रश्न इतकाच सोपा आसता तर सरकारने अनेक देशांच्या दूतांना माहिती कशाला दिली. मी तर सरकारकडून थेट स्पष्टीकरण मागत होतो.
मंगळवारी संसदेत अधीर रंजन चौधरी म्हणाले होते की, ”1948पासून जम्मू-काश्मीर हा विषय संयुक्त राष्ट्राच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे हे अंतर्गत प्रकरण कसे होईल. आपण शिमला करार केला, लाहोरला बसची घोषणा केली, त्यामुळे ही सर्व अंतर्गत प्रकरण होती की द्विपक्षीय करार हे अमित शहांनी मला सांगावे. त्यानंतर अमित शहा यांनी सुद्धा अधीर रंजन चौधरी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
अमित शहा म्हणाले, कॉंग्रेसनं हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात असल्याचे सांगितले आहे आणि त्यांची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही हे विधेयक घेऊन आलो आहोत. कॉंग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही अमित शहा म्हणाले. तसेच जेव्हा मी जम्मू-काश्मीर राज्य असा उल्लेख करतो, त्यात पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनही येते. काश्मीरबाबत निर्णय घेण्याचा संसदेला अधिकार आहे. त्यासाठी कुणाचीही संमती घ्यायची गरज नाही. संसद हे सर्वोच्च सभागृह आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेडलेस कॉंग्रेस आता ब्रेनलेस झाली आहे – नक्वी
अधीर रंजन चौधरी यांच्या काश्मिर बाबतच्या विधानानंतर सगळीकडून कॉंग्रेस वर टिका होत असून भाजपचे केंद्रिय मंत्री मुख्तार अब्बस नक्वी यांनी हेडलेस कॉंग्रेस आता ब्रेनलेस झाली आहे अशी टिका करत चौधरी यांना या विषयाचे गांभिर्य माहित नाही असा टोला लगावला आहे.