कोलकाता – प्रख्यात बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. गेले महिनाभर त्यांचा विविध अजारांशी लढा सुरू होता. ते 85 वर्षांचे होते.
या महान कलाकाराच्या मागे पत्नी दीपा, कन्या पौलोमी बासू आणि मुलगा सौगात चटर्जी असा परिवार आहे. चटर्जी यांना करोनाचा संसर्ग झाल्याने सहा ऑक्टोबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यात त्यांच्या मध्यवर्ती मज्जासंध्येवर परिणाम झाला. त्यातच त्यांची मुत्रपिंड निकामी झाली.
त्यांनी करोनावर मात केली. रूग्णालयात त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी, डायलिसीस आणि अन्य उपचार करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती सुधारली नाही. डॉक्टरांनी ते उपचाराला प्रतीसाद देत नसल्याचे शुक्रवारी जाहीर केले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्य सचिव अलापन बंदोपाध्याय आणि मंत्री इंद्रनील सेन यांनी चटर्जी यांच्या निधनाचे वृत्त समजाताच रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दात बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला.
चटर्जी यांनी गेली सहा दशके चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या. ऑस्कर विजेते चित्रपट निर्माते सत्यजीत रे यांच्यापासून प्रेरणा घेत चित्रपट सृष्टीत प्रवेश करणाऱ्या या सर्वकालीन महान अभिनेत्याने बंगाली सिनेमाला जागतिक दर्जा मिळवून दिला. त्यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेता, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक अशा अनेक भूमिका निभावल्या त्यांना फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्का लिजंड हॉनरने सन्मानित करण्यात आले होते.
हा अभिनेता उच्चतेच्या पलिकडचा होता. आमच्या कुटुंबियाशी त्यांचा स्नेह सहा दशकांहून अधिक काळ होता. ते प्रत्येक गोष्टीबाबत चौकस होते. परफेक्शनिस्ट हाच शब्द त्यांना लागू होतो, अशी प्रतिक्रिया सत्याजित रे यांचे चिरंजीव संदीप यांनी व्यक्त केली.
ते आपल्यात नाहीत, यावर माझा विश्वासच बसत नाही. शेवटच्या क्षणी काही तरी चमत्कार होईल आणि ते खडखडीत बरे होतील, अशी आशा मला अखेरच्या क्षणापर्यंत होती. ते माझ्या कुटुंबियांतीलच एक होते, अशी वेदना त्यांच्यासह अनेक चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्री अपर्णा सेन यांनी व्यक्त केली.