आळंदी (देवाची) – राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला म्हणजेच कार्तिकी वारीला देखील प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी भक्ती शक्ती संघाने केली आहे. यासंर्भात जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा आहे व वारकरी परंपरेत माऊलींच्या समाधी सोहळ्याचे फार महत्व आहे. अश्यातच यावर्षी कोरोना संसर्गामुळे आषाढी वारी पालखी सोहळा झालेला नाही त्यामुळे सर्व वारकऱ्यांना कार्तिकी वारीची आस लागली आहे.
या सोहळ्याला लाखो वारकरी आळंदी नगरीमध्ये येत असतात. परंतु कोरोनाचे सावट म्हणावे तसे हटलेलं नाहीये. त्यामुळे लाखोंचा होणारा हा सोहळा निदान कमीतकमी वारकऱ्यांच्या समवेत संपन्न व्हावा व दिंड्यांना शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
याविषयी सांगताना भक्ती शक्ती संघाचे सचिव अविनाश महाराज धनवे म्हणाले की, “कोरोनामुळे सर्वांच्या जीवाला धोका आहे, ही गोष्ट मान्य आहे. पण शासनाने काही नियमावली लावून ५० वर्षांच्या आतील वारकरी आळंदी मध्ये येण्याची परवानगी द्यावी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना कोरोना पासून धोका निर्माण होऊ शकतो अश्या वारकऱ्यांना येण्यापासून आपण थांबवू शकतो.
त्यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, भक्ती शक्ती संघाच्या वतीने या कार्तिकी वारी काळात प्रशासनाला सहकार्य म्हणून 200 स्वयंसेवक नेमण्यात येतील, ज्या ठिकाणी धर्मशाला, दिंडी, भक्त निवास, कार्यालये आहेत अश्या ठिकाणी सॅनिटाईझ करण्यासाठी जनजागृती करू, त्याचप्रमाणे मास्क वापरणे सोशल डिस्टन्स चे पालन करत यावर्षी कार्तिकी वारीला परवानगी मिळावी असे धनवे पाटील म्हणाले.
कार्तिकी वारी काळात आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांना मास्क आणि सॅनिटाईझर चे वाटप ‘आम्ही वारकरी संस्था’ आणि ‘भक्ती शक्ती संघ’ यांच्या वतीने विनामूल्य केले जाईल, असे आम्ही वारकरी संस्थेचे अध्यक्ष श्री रामभाऊ चोपदार यांनी सांगितले.
या सर्व गोष्टींसाठी आळंदी देवाची येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, वारकरी सेवा संघ, आम्ही वारकरी संस्था, सर्व सेवाभावी संस्था, आणि वारकरी संघटना यांनी स्वाक्षरी देऊन या मागणीला पाठिंबा दिला आहे.
जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना पत्रक देताना भक्ती शक्ती संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज पाटील, कार्याध्यक्ष संग्राम महाराज भंडारे, अविनाश धनवे पाटील हे उपस्थित होते.