कोलकता -तृणमूल कॉंग्रेस सरकारने पश्चिम बंगालचे रूपांतर पोलिसांच्या राजवटीत केले आहे. राज्यात घटनेचे रक्षण होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास मला कार्यकारी अधिकार हाती घ्यावे लागतील, असा इशारा राज्यपाल जगदीप धनखर यांनी सोमवारी दिला.
धनखर यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालचे पोलीस प्रमुख विरेंद्र यांना पत्र पाठवून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. त्याला विरेंद्र यांनी एक ओळीचे उत्तर दिले. कायद्याने आखून दिलेल्या मार्गावरून पोलीस दल वाटचाल करते, असे पोलीस प्रमुखांनी नमूद केले. त्या उत्तरामुळे आणखी नाराज झालेल्या धनखर यांनी विरेंद्र यांना 26 सप्टेंबरपर्यंत भेटण्यास सांगितले. त्या घडामोडीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धनखर यांना पत्र पाठवून त्यांना घटनेच्या कार्यक्षेत्रात राहून कार्य करण्याची विनंती केली. त्यापार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत धनखर यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचे सूचित झाले.
पश्चिम बंगालमध्ये दीर्घ काळापासून राज्यपालपदाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मला घटनेच्या 154 व्या कलमाचा विचार करावा लागेल, असे धनखर यांनी म्हटले. ते कलम लागू झाल्यास राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालांच्या हाती जातात. ते स्वत: किंवा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते अधिकार वापरू शकतात.
दरम्यान, पोलीस प्रमुखांनी दिलेले उत्तर बेजबाबदारपणाचे होते. बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ढासळली आहे. राज्यात नक्षलवाद डोके वर काढू लागला आहे. त्याशिवाय, दहशतवादी गटही सक्रिय होत असल्याचे आढळून येत आहे, अशा आरोपांची सरबत्ती धनखर यांनी केली. राज्यपालपद केवळ पोस्ट ऑफिस किंवा रबरी स्टॅम्प असल्याच्या गैरसमजात ममता असल्याचा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.