मुंबई: आपल्या राहुटी कार्यक्रमाअंतर्गत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू जनसामान्यांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडवत आहेत. ‘फैसला ऑन द स्पॉट’ करणारे आमदार म्हणून बच्चू कडू परिचित आहेत. दरम्यान त्यांनी शहीद झालेल्या जवान संभाजी कदम यांच्या ६ वर्षाच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याना चांगलेच धारेवर धरले.
बच्चू कडू म्हणाले, देशाकरीता शहीद झालेल्या जवान संभाजी कदम यांच्या ६ वर्षाच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारणे अतिशय निंदणीय आहे. सदर मुलीला लवकरात लवकर शाळेत प्रवेश मिळावा या संबंधी आदेश दिले व प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले आहे.
देशाकरीता शहीद झालेले नांदेड जिल्ह्यातील जवान संभाजी कदम यांच्या वीरपत्नी शीतल कदम आपल्या मुलीला शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी धडपड करत होत्या. मात्र त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या प्रकारांची बच्चू कडू यांनी दखल घेतली आहे.
एका वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले होते. अनेक शाळांचे उंबरठे झिजवूनही लेकीला शाळेत प्रवेश मिळत नाही. वर्षभरापासून शाळेच्या प्रवेशासाठी प्रयत्न करुनही यश मिळालं नाही. त्यामुळे वीरपत्नी यांनी सांगितले की, जिथे आम्ही गेलो तिथं आम्हाला साधी विचारपूसही केली जात नव्हती. अनेक पत्र घेऊन गेले तरीही उत्तर मिळालं अशी पत्र खूप येतात. याचा फरक पडत नाही अशी उत्तरं शाळांकडून ऐकायला मिळाली.