नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्याने राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलं आहे. सध्याच्या घडीला दिल्ली काबीज करण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली असली तरी प्रत्यक्ष प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष व भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहेत. मात्र राजकीय वातावरण तापलं असताना देखील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, दिल्ली विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य करून भारताच्या अंतर्गत मुद्द्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच चपराक लगावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, काल पाकिस्तानचे मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, ‘भारतीय जनता पक्ष आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाच्या छायेत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानवर हल्ला करण्याची भाषा करत आहेत.’ आशा आशयाचं एक ट्विट केलं होतं.
फवाद यांच्या या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. केजरीवाल यांनी याबाबत ट्विट करताना, ‘आतंकवादाच्या सर्वात मोठ्या पुरस्कर्त्यांनी आमच्या देशात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नये’ अशी सणसणीत चपराक लावली आहे. आपल्या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी, ‘नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत व ते माझेही पंतप्रधान आहेत! दिल्ली निवडणुका हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून आतंकवाद्यांच्या सर्वात मोठ्या पुरस्कर्त्यांनी आमच्या देशामध्ये ढवळाढवळ करू नये. पाकिस्तानने कितीही प्रयत्न केले तरी ते आमच्या देशातील एकता भंग करू शकणार नाहीत.’ असं देखील म्हंटल आहे.
नरेंद्र मोदी जी भारत के प्रधानमंत्री है। मेरे भी प्रधानमंत्री है। दिल्ली का चुनाव भारत का आंतरिक मसला है और हमें आतंकवाद के सबसे बड़े प्रायोजकों का हस्तक्षेप बर्दाश्त नहीं। पाकिस्तान जितनी कोशिश कर ले, इस देश की एकता पर प्रहार नहीं कर सकता। https://t.co/E2Rl65nWSK
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 31, 2020