पुण्याच्या पर्यावरणाला “केमिकल रिऍक्शन’
पुणे -एकीकडे राज्यातील पर्यावरणाला “साखरे’ची बाधा होत आहे, तर पुण्यातील पर्यावरणावर केमिकल रिऍक्शन उमटत असल्याचे दिसून येत आहे. कंपन्यांकडून सर्वाधिक प्रमाणात पर्यावरण नियमांचे उल्लंघन केले जात असून, शहरातील हवा आणि पाण्याचे प्रदूषण वाढण्यासाठी साखर कारखान्यांबरोबरच रासायनिक कंपन्यांचाही वाटा अधिक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईतून समोर आले आहे.
मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे गेल्या वर्षभरात तब्बल 185 कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बारामती, इंदापूर, मुळशी, लोणावळा, कुरकुंभ आणि सोलापूर एमआयडीसीतील कंपन्यांचा समावेश आहे. कारवाई करण्यात आलेल्या कंपन्या रासायनिक उद्योगाशी निगडित असल्याचे दिसून येते. मंडळाच्या प्रादेशिक विभागाअंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
चाकण, तळेगाव, कुरकुंभ या औद्योगिक भागांमध्ये रसायननिर्मिती कंपन्यांचे प्रमाण अधिक आहे. तर दौंड, बारामती, इंदापूर या तालुक्यांमध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. मंडळातर्फे या कंपन्यांची नियमितपणे पाहणी केली जाते. या पाहणीत दोषी आढळणाऱ्या कंपन्यांवर तसेच विविध प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाते. त्यानुसार मंडळाने वर्षभरात वरील कारवाई केली असून, यामध्ये अनेक कंपन्यांना बंदीचे आदेशही दिले आहेत.
– डॉ. जे. बी. सांगेवार, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ