नागपूर : दीक्षान्त समारंभाचे स्वरुप इंग्रजांच्या काळापासून आजही तसेच कायम आहे. यापुढे दीक्षान्त समारंभाचे स्वरुप बदलवून ते मराठमोळ्या पद्धतीने आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले.
राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शासकीय तंत्र निकेतन स्वायत्त संस्थेचा 24 वा पदविका प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य तथा नियामक मंडळाचे सदस्य सचिव डॉ. मनोज डायगव्हाणे, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजचे संचालक राजेश चौधरी, शासकीय तंत्र निकेतनचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, परीक्षा नियंत्रक डॉ. एस. बारस्कर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पदविका प्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यामुळे असा कार्यक्रम विद्यार्थी केंद्रितच असावा, असे सांगून मंत्री सामंत पुढे म्हणाले की, पदविका प्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा असावा. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी या सोहळ्यातच मार्गदर्शन मिळावे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असावा. बदलत्या काळानुसार, पुढील काळात दीक्षान्त समारंभाचे स्वरुप बदलविण्यात येईल. पदविका प्रदान समारंभात विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी उद्योग, स्वयंरोजगार, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, नामांकित कंपन्यांचे व्यावसायिक यांना आमंत्रित करण्यात येईल. विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा लाभ होईल. यामुळे पदविका प्रदान समारंभात भविष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली अनुभवाची शिदोरी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मिळेल, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी अनेक अडचणींचा सामना करीत अभ्यास केला. त्या काळात ऑनलाईन परीक्षा ही गरज होती. परंतु आता ऑफलाईन परीक्षा पद्धती स्वीकार करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता बदलवून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी प्राचार्य व प्राध्यापकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.