प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी व आत्मनिर्भर विचारावर देश जागतिक दर्जाची क्षेपणास्त्रे तयार करत आहे. “डीआरडीओ’मध्ये सध्या स्वदेशी बनावटीचे लढावू विमान, एचसीएलसाठी विमाने तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. भारतीय लष्काराला लवकरच अत्याधुनिक मानवविरहित युद्ध वाहने पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती “मिसाइल वुमन’ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांनी केले.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते डॉ. थॉमस यांना प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. गीताली टिळक-मोने उपस्थित होते.
डॉ. थॉमस म्हणाल्या, “”भारतीय संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (डीआरडीओ) माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी मला प्रथम अग्नी प्रकल्पामध्ये संशोधनाची संधी दिली. यावेळी लांब पल्ल्याच्या स्वदेशी क्षेपत्रणास्त्राचे तंत्रज्ञान फारसे विकसित झाले नव्हते. त्याबाबत पायाभूत सोयीसुविधा नव्हत्या. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाविषयी फारसे संशोधन झाले नव्हते.
मात्र कलाम हे “डीआरडीओ’चे प्रमुख असताना त्यांनी पुढील 30 वर्षांचे स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राचे स्वप्न पाहिले. त्यामुळेच आपण स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्षेपणास्त्राचे संशोधन करू शकलो. आज देशाच्या संरक्षण क्षेत्रात हे क्षेपणास्त्र महत्त्वाचे योगदान देत आहे. कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली 3 हजार 500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर 4 हजार, 5 हजार ते 8 हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला बळ मिळत आहे.
सुशिलकुमार शिंदे म्हणाले, “”संरक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात शास्त्रज्ञ पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारे येतात, जातात; पण शास्त्रज्ञांचे यज्ञ कधीच थांबत नाहीत. त्यांचे संशोधन सुरुच असते. संशोधन क्षेत्रात शास्त्रज्ञांचे काम अमूल्य असून त्यांनी देशाला मोठी उंची गाठून दिली आहे. ज्या ठिकाणी टाचणी तयार होत नव्हती त्या ठिकाणी आपल्या शास्त्रज्ञांनी अग्नी क्षेपणास्त्राचा शोध लावला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या भारतीय बनावटीचे साहित्य, संशोधनाचे साहित्य देशातच होत असून हे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेनेच काम होत आहे. आत्मनिर्भर भारत हेच त्यांचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकमान्यांचे विचार आजही महत्वाचे
डॉ. टिळक म्हणाले, “”लोकमान्यांची कोणतीच मांडणी भावनिक नव्हती. त्यांच्या मांडणीमागे प्रचंड अभ्यास आणि विचारांचे अधिष्ठान होते. शेती, उद्योग, सहकार क्षेत्राचा शास्त्रीय अभ्यास करून लोकमान्यांनी आधुनिक भारताचा आराखडा मांडला. लोकमान्यांनी तेव्हा मांडलेले विचार आजही उपयुक्त ठरत आहेत.”