पुणे – इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना सुरू केली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत राज्य शासनाकडून मदत दिली जाते. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात 1 हजार 190 विद्यार्थी राज्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश, अवयव निकामी अथवा पाण्यात बुडून मृत्यू अशा अपघाती विद्यार्थ्यांचे मृत्यू दरवर्षी राज्यभरात होतात. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात या योजनेंतर्गत 1 हजार 69 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. गतवर्षी 1 हजार 190 विद्यार्थ्यांना या योजनेंर्गत मदत देण्यात येत असल्याचे प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले. दरवर्षीच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील 1 हजार विद्यार्थी अपघाती मृत्यू होणे ही बाब चिंताजनक आहे.
त्यातच या योजनेसाठी विद्यार्थ्यांचे शवविच्छेदन करण्याचे निकष आहेत. ते निकष पूर्ण करण्यात काही पालक दुर्लक्ष करतात. या योजनेसाठी मृत विद्यार्थ्यांचे पालक प्रस्ताव पाठविण्यास उदासिनता दाखवितात. त्यावरून विद्यार्थ्यांचे अपघाती मृत्यूची संख्या आणखी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.