सातारा – भीमाशंकरकडून मंचरकडे येत असताना भरधाव दुचाकीचा पिकअपला कट बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील अवसरी खुर्द (ता .आंबेगाव) येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. तर मूळचा साताऱ्यातील ओमकार उमेश सुमंत (वय 20, रा. शनिवार पेठ, सातारा) याचा मृत्यू झाला.
शिनोली (ता. आंबेगाव) येथे हा अपघात गुरुवार दि .30 रोजी सकाळी नऊच्या दरम्यान झाला. याबाबत घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवसरी इंजिनिअरिंग कॉलेजचे तीन विद्यार्थी ओमकार उमेश सुमंत, सागर संतोष उगले (वय 20, रा. काळजांबा वाशिम), नईम यासीद नदाफ (वय 20, रा. कोतळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर) हे तिघेजण भीमाशंकर येथे फिरण्यासाठी गेले होते. ते तिघेजण दुचाकीवरून (एमएच 27 बीयू 5299) भीमाशंकर येथून मंचरकडे येत असताना शिनोली गावच्या हद्दीत पिकपगाडी (एमएच 14 एचयू 8842) घोडेगाववरून तळेकरकडे जात असताना या गाडीला दुचाकीची कट बसून अपघात झाला.
या अपघातानंतर ओमकार सुमंत याला उपचारासाठी घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. तर सागर उगले व नईम नदाफ यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही आयसीयूमध्ये असल्याने ते बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस रवींद्र सुरकुले, निलेश तळपे तपास करत आहे.