मंचर, (प्रतिनिधी) – लोणी (ता.आंबेगाव) येथील रहिवासी संदीप दत्तात्रय पोपळघट (वय ५२) यांच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशीच अपघाती निधन झाले असल्याची दुःखद घटना लोणी येथे घडली आहे. या अपघातात त्यांची दुसरी कन्या ऋतूजा पोपळघट (वय १८) ही जखमी झाली आहे.
याबाबत माहिती अशी की संदीप पोपळघट यांचे मूळ गाव (देवी भोयरे-ता.पारनेर.जि.नगर) पण सध्या लोणी (ता.आंबेगाव) येथे राहात होते व पुणे या ठिकाणी खाजगी कंपनीत काम करत होते. त्यांची मोठी मुलगी अक्षदा पोपळघट हिचा विवाह शनिवार (दि. ३०) रोजी दुपारी तीन वाजता थापेवाडी येथील मंगल कार्यालयात पार पडला.
विवाह झाल्यानंतर सर्व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर लग्न झालेल्या मूलीची पाठराखण करण्यासाठी धाकटी मुलगी ऋतूजाला पाठवायचे होते. म्हणून ऋतुजा वडील संदीप पोपळघट यांच्याबरोबर लोणी येथील घरी कपड्याची बॅग आणण्यासाठी लोणीच्या दिशेने दूचाकीवरून जात असताना बांधनवस्ती या ठिकाणी गतिरोधक आला म्हणून दूचाकी वाहन सावकाश केले.
याचवेळी पाठीमागून जोरात येणाऱ्या टेम्पोने जोरात धडक दिली. या धडकेत संदीप पोपळघट हे डोक्यावर पडल्याने जबर जखमी झाले. त्यांना प्रथम लोणी व नंतर चाकण या ठिकाणी दाखल केले. तर मूलगी ऋतूजाचा एक पाय फ्रॅक्चर व दुसऱ्र्या पायाला मोठी दुखापत झाली. तर वडील संदीप पोपळघट यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांचे रविवार (दि.१) रोजी पहाटे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा,दोन मूली, असा परिवार असून लोणी येथील चेतन लोखंडे यांचे ते मेव्हूणे होते. त्याच्या या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विवाहानंतर वृत्त कळाले…
अक्षदाचा विवाह झाला व या घटनेची माहिती मिळाली. पण अक्षदाला सांगण्यात आले किरकोळ अपघात झाला आहे. त्यांना लोणी येथे अॅडमिट केले आहे. त्यानंतर अक्षदा बारामती येथे वऱ्हाडी मंडळीसह दाखल झाली. दुसऱ्र्या दिवशी हळद फेडण्याचा कार्यक्रम पार पडला आणि ही दुःखद घटना अक्षदाच्या कानावर पडली. आणि अक्षदाने पप्पा….. पप्पा असा हबरडा फोडला. मुलीच्या लग्नाच्या दिवशीच काळाने आघात केला आणी कोणाच्याही वाट्याला येवू नये, असा दुःखाचा प्रसंग पोपळघट आणी लोखंडे कुटुंबीयांसमोर आला.
बेल्हे ते जेजूरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्याने सर्वच लहान मोठे वाहन चालक बेफाम वाहने चालवितात. गतिरोधकाला सुद्धा जुमानत नाही.अशा वाहन चालकांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी गस्तीपथक किंवा गती नियंत्रित करणारे पथक नेमावे.- रवींद्र करंजखेले, माजी पंचायत समिती सदस्य.
बेल्हे ते जेजूरी या राज्य मार्गावर गेल्या चार पाच वर्षांत अनेक मोठे अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यावर शिक्रापूर त लोणी ३३ गतिरोधक असून या गतिरोधकांवर बर्याच ठिकाणी पांढरेपट्टे नसल्याने वाहन चालकाच्या लक्ष्यात गतिरोधक येत नसल्याने अपघात होतात.सार्वजनिक बांधकाम विभागाने या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात यावेत. उर्मिला धुमाळ, माजी सरपंच, -शरद वाळूज ग्रामस्थ लोणी .