नवी दिल्ली – लवकरच खरिपाचा हंगाम सुरू होणार आहे. त्या हंगामासाठी पुरेसा युरिया खताचा साठा देशांमध्ये उपलब्ध असल्याचा दावा केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडवीया यांनी केला आहे. ते म्हणाले की, हा साठा रब्बीसाठीही उपयोगात येणार आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत युरिया आयात करण्याची कसलीही गरज नाही. गेल्या तीन महिन्यापासून जागतिक बाजारात खतांचे दर कमी झाले आहेत.
पुढील सहा महिन्यांमध्ये खतांचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील शेतकऱ्यांना पुरेसे खत उपलब्ध होण्यात कसलेही अडथळे नाहीत. या अगोदरच 16 लाख टन युरिया आयात करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पुढील 45 दिवसांमध्ये हा युरिया भारतामध्ये दाखल होईल.
डीएपी म्हणजे डाय अमोनिअम फॉस्फेट या खताचे देशातील उत्पादन वाढले आहे. त्याचबरोबर दिर्घ पल्ल्यात गरज भागावी यासाठी या खताच्या आयातीचे यशस्वी करार करण्यात आले आहे. जागतिक खताच्या किमतीपेक्षा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात येत असलेल्या खताच्या किमती फारच कमी आहेत. कारण यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतामध्ये काही ठिकाणी खरिपाची पेरणी अगोदरच सुरू झाली आहे. रब्बीची पेरणी आक्टोबर महिन्यात सुरू होते. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध व्हावीत याकरिता सरकारने अनेक पातळ्यांवर उपाययोजना केल्या आहेत. ते म्हणाले की देशात सध्या 70 लाख टन युरियाचा साठा आहे.
16 लाख टन युरिया आयात केला जात आहे. परदेशांमध्ये डिसेंबर पर्यंत 175 लाख युरियाचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे भारतात 287 लाख टन युरिया उपलब्ध होणार आहे. तर भारताची वार्षिक गरज 210 लाख टनांची आहे. देशात युरियाचे उत्पादन वेगाने होत असल्यामुळे हळूहळू आयात कमी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी दिलेल्या मदतीचा फायदा घेत देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविले असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.