पुणे – ” देवेंद्र अकेला नही हैं, ना कभी था. उनके साथ पुरी कायनात हैं’ अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी भाजपच्या राज्यसभा विजयाचे कौतुक करत पुण्यात राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी “विकासाचे राजकारण करणारे पुढे जातील, टोमणेबाजी करणारे मागेच राहतील,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाल्या, “या विजयाचा आपल्याला आनंद आहे. अकेला देवेंद्र क्या करेगा असे म्हटले जात होते. पण, देवेंद्र एकटे नाहीत हे राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील भाजप उमेदवाराच्या विजयावरून निश्चित झाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपसमवेत आलेले लोक हे प्रेमाने आलेले आहेत. सरकार कसे चालते ते त्यांना कळले आहे. भाजप रडीचा डाव खेळत नाही, सर्व गोष्टी आपल्या कर्तृत्वावर करते. त्यामुळे हा सत्याचा विजय आहे. सर्वजण सत्याच्या बाजूने आहेत, याचा मला आनंद आहे. तसेच विधान परिषदेतही भाजपला चांगले यश मिळेल.’
पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य?
दरम्यान, देहविक्रीय करणाऱ्या महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या कार्यक्रमात फडणवीस यांनी “देहविक्री करणाऱ्या महिलांमुळेच समाजात समतोल साधला जातो. देहविक्रीला व्यवसाय म्हणून मान्यता मिळायला हवी,’ अशा भावना व्यक्त केला आहेत. तसेच या महिला समाजाचा अविभाज्य भाग आहे. त्यांनाही मान मिळायला हवा,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिला आघाडीच्या अध्यक्ष अर्चना पाटील तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.