– हिमांशू
हे काय बरोबर नाही राव! वर्षभर गरम पाणी प्यायला लावलं, तेही लिंबू वगैरे पिळून… आता म्हणतायत त्याचा काही उपयोग नाही म्हणे! मग वर्षभर ज्या गॅसवर पाणी गरम करायला लावलं, ती काय उज्ज्वला योजनेची जाहिरात होती असं म्हणायचे का? एक तर गेल्या वर्षीपासून आपण काय खातोय, कधी खातोय, हेही नीटसं कळेना झालंय. सगळ्या दिवसाचं गणित उलटंपालटं झालंय आणि त्यातच सल्लागारांची ही मांदियाळी! कुणाचं ऐकावं आणि का ऐकावं, याला काही लॉजिकच उरलेलं नाही. आधी कुणीतरी आम्हाला काढा करून प्या, असं सांगितलं. मिरे, दालचिनी, आलं, लवंग, वेलची, हळद, जिरं असं एकत्र करून खळाखळा उकळून काढा केला, त्यात लिंबू पिळलं. बरेच दिवस असा काढा प्यायल्यावर अचानक अंगात उष्णता वाढली.
मग कुणीतरी म्हणालं, रोज मिरे आणि दालचिनी पोटात जातीय म्हटल्यावर वाढणारच उष्णता! पण ही झाली सांगोवांगी कहाणी. गरम पाणी प्यायला तर थेट सरकारनेच सांगितलं होतं आम्हाला. गेल्या वर्षभरात कुणाकुणाचं, काय-काय ऐकलं आणि त्यानुसार काय-काय केलं, हे आठवत नसलं तरी सरकारचं ऐकून काही गोष्टी आम्ही निश्चितपणे केल्या. हात धुणं, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क या त्रिसूत्रीबरोबरच पाण्याची वाफ घेणं आणि गरम पाणी पिणं या गोष्टी आमच्या दिनक्रमात सरकारमुळेच समाविष्ट झाल्या.
एक तर हा करोना नावाचा विषाणू कुणाला नीटसा कळलेला नाही. पण तो आपल्यालाच कसा कळलाय, हे सांगणाऱ्यांची लाइन लागलीय. सोशल मीडिया, विशेषतः व्हॉट्सऍप विद्यापीठ कोविडविषयक ज्ञानानं तुडुंब भरून वाहतंय. विटॅमिन सी, विटॅमिन डी आणि झिंक असा कॉम्बो असलेल्या गोळ्या आम्ही सगळ्यात सुरुवातीला खाल्ल्याचं आठवतंय. त्यानंतर एका गृहस्थानं आम्हाला व्हॉट्सऍपवर एका आयुर्वेदिक गोळ्यांची माहिती पाठवली. सलग दहा दिवस गोळी घ्यायची, नंतर दहा दिवस मोकळे ठेवायचे, मग पुन्हा दहा दिवस गोळी घ्यायची… असं पाच-सात वेळा करायचं. एवढं झालं की इम्युनिटी तयार! कोविड जवळपाससुद्धा फिरकणार नाही, याची गॅरंटी दिल्यामुळे आम्ही त्याही घेतल्या. मग काढ्याचा उपरोक्त पराक्रम करून झाला.
वाफारे तर देवाला अंगारे-धुपारे करावेत, अशा श्रद्धेनं घेतले आम्ही. परंतु व्हॉट्सऍप विद्यापीठावरची उपचारांची यादी अजून संपलेलीच नाही. शिवाय, आता काही वेगळे तज्ज्ञही या विद्यापीठात शिकवायला आलेत. त्यांच्या मते, करोना मुळात नाहीच! “मग एवढी माणसं मृत्युमुखी का पडतायत,’ असा प्रश्न या “तज्ज्ञां’ना विचारला तर प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरं असतात. कोविड नसताच, तर आतापर्यंत अपघातांत, आजारपणामुळे वगैरे किती माणसं गेली असती, असा हिशोब हे मांडतात.
लॉकडाऊनमुळे रहदारीच नव्हती आणि त्यामुळे अपघात झाले नाहीत, याचा अर्थ ती मृत्युसंख्या दुसरीकडे भरून निघाली पाहिजे, अशी अजब तर्क असलेली ही मांडणी ऐकून आम्ही काही दिवसांनी व्हॉट्सऍप विद्यापीठाचा नाद सोडला. आपल्याला सरकार जे सांगेल, तेवढंच ऐकायचं, सरकारी तज्ज्ञ हेच खरे तज्ज्ञ आहेत असं मानायचं, हे पक्कं ठरवलं. पण तिथूनही भ्रमनिरासच होणार आहे, याची अजिबात कल्पना नव्हती. आम्ही वर्षभर प्यायलेलं गरम पाणी फुकट गेलं ना!