आलं बरं का… फाइव्ह-जी नेटवर्क भारतातसुद्धा आलं..! तूर्तास ठराविक शहरांमध्ये असलं म्हणून काय झालं? पुढारलेल्या समाजांमध्ये आपली गणना तरी होऊ लागली की नाही? ज्यांना निगेटिव्हच बघायची सवय लागलीये, त्यांना या नेटवर्कच्या आगमनाची किंमत आणि गंमत काय कळणार?
ते अजूनही गॅस सिलिंडरच्या भाववाढीतच अडकून पडलेत. काही नाही हो… सगळ्यांना सगळं परवडत असतं. हेच लोक इतरत्र पैसा उडवताना अजिबात हयगय करत नाहीत; पण महागाई शब्दातला “म’ उच्चारायचा अवकाश… यांचं सगळं बजेट कोलमडून पडतं म्हणे! हां, तर विषय असा की, आमच्या गावात फाइव्ह-जी नेटवर्क अजून आलेलं नसलं, तरी आम्ही आनंदात आहोत. मोबाइलच्या किमतींच्या बाबतीत आम्ही कधीच फिकीर केली नाही. नवीन तंत्रज्ञान आलं रे आलं, की आम्ही त्या तंत्रज्ञानाचा समावेश असणारा सगळ्यात महागडा मोबाइल विकत घेतला आणि जुना… काय माहीत कुठे गेला!
पाच-सात मोबाइल असेच “तंत्रार्पणमस्तु’ केल्यानंतर आता आम्ही पुन्हा नवा मोबाइल घेण्याच्या विचारात आहोत. कारण आमचा सध्याचा मोबाइल उत्तम चालत असला, तरी तो “फोर-जी’ बॅंडचा आहे. गावात नेटवर्क येण्यापूर्वी “फाइव्ह-जी’ बॅंडचा मोबाइल घेणार… गावात सगळ्यात आधी! पण काहीजण या नेटवर्कला इतके का घाबरलेत, काही कळत नाही. अशाच एका अतिचिकित्सा करणाऱ्या आमच्या मित्रानं तर आम्हाला गणितच घातलं. काळ-काम-वेगाचं!
म्हणाला, फोर-जीपेक्षा दसपट वेग म्हणजे जो व्हिडिओ डाउनलोड व्हायला फोर-जी ला दहा सेकंद लागतात, तो फाइव्ह-जी किती सेकंदात डाउनलोड करेल? आम्ही म्हटलं, एका सेकंदात! मग म्हणाला, समज… तू दररोज सरासरी पाच तास मोबाइल बघतोस. आता इंटरनेटचा स्पीड दसपट झाल्यावर तुझं काम अर्ध्या तासातच पूर्ण होईल. म्हणजे तुझा डेली स्क्रीन टाइम अर्ध्या तासावर येईल. मग तुला साडेचार तास एक्स्ट्रा मिळतील. तेवढे तास तू घरच्या किंवा बाहेरच्या कामात घालवशील. म्हणजे तुझी कृतिशीलता वाढेल, बरोबर ना?
मित्राच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं कळेना. कारण टू-जीपासून फोर-जीपर्यंतचा हिशोब केला तर स्क्रीन टाइम हळूहळू वाढतच गेलाय. मित्र म्हणाला, कामाचा वेग वाढला की कामाला लागणारा वेळ कमी होतो, हा गणिताचा सिद्धांत आहे. एवढ्यावर न थांबता त्यानं कॅनडातल्या एका सर्व्हेचं उदाहरण दिलं. म्हणाला, तिथं पाच ते अठरा वयोगटातली दोन मुलं असणाऱ्या पालकांचा अभ्यास केला. जे पालक मोबाइलच्या संपर्कात जास्त वेळ राहतात, ते खूपच चिडचिडे होतात आणि पोरांवर राग काढतात, म्हणे! मित्रानं त्याच्यावर चिडण्याची आमची वाट आधीच अशी बंद करून टाकली आणि मग आणखी घाबरवून सोडलं
म्हणाला, फोन आणि इतर डिजिटल उपकरणं वापरणारे 75 टक्के पालक नैराश्याचे बळी ठरतात. त्यांच्या वर्तनात बदल होतात. ते बघून पोरांच्याही वर्तनात बदल होतात. जे दररोज चार-पाच तास डिजिटल मीडियावर घालवतात, त्यांची वाट निश्चित झाली (किंवा लागली) असं समजा! मित्र हे असे असतात बघा..! फाइव्ह-जी बॅंडचा मोबाइल घ्यायचा की नाही, असा भुंगा सोडून निघून जातात. पण खरं सांगू? असे मित्र सगळ्यांना मिळायला पाहिजेत!