कर्नाटकातील म्हैसूर येथील राहुल गांधी यांची सभा सध्या चर्चेत आहे. कारण ही सभा चक्क पावसात झाली. कर्नाटकात राहुल गांधी यांनी सातारा येथील “पवार पॅटर्न’ राबवत पावसात सभा घेतली. राहुल गांधी यांचे भाषण सुरू होताच अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, तरीही त्यांनी भाषण सुरूच ठेवले. देशातील अनेकांची राहुल यांच्या पावसातील भाषणाला पसंती मिळत आहे.
कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि केंद्र सरकारच्या धोरणावर अनेक प्रश्न विचारतात. त्यामुळे राहुल यांची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. स्वत: राहुल गांधींनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आम्हाला भारताला एकत्र करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारताचा आवाज उठवण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेला कोणीही रोखू शकत नाही, असे म्हणत राहुल यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथील पावसात घेतलेल्या राहुल गांधींच्या सभेने देशभरातील लोकांची मने जिंकली आहेत. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणे भाजपावर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी भर पावसात सभेला उपस्थित राहिलात म्हणून नागरिकांचे आभार मानले.
2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे झालेल्या प्रचारसभेला संबोधित करत असताना मध्येच मोठा पाऊस आला होता. भर पावसात शरद पवार हे सभेला संबोधित करत राहिले. यावेळी त्यांनी छत्री घेण्यासही नकार दिला होता. या सभेमुळे निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे यश मिळाले होते. पवार यांनी या भाषणादरम्यान पडणाऱ्या पावसाला वरुणराजाचा आशीर्वाद संबोधले होते. या पावसातील सभेने विरोधकांचे मनोधैर्य उंचावले होते. त्यामुळे साताऱ्यातील सभेने एक इतिहास निर्माण केला होता आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनतेने पसंतीची पोचपावती दिली होती. राहुल गांधी यांची पावसातील सभा असाच इतिहास निर्माण करणार का, हे आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येईल.
राहुल यांच्या कार्यकाळात कॉंग्रेसला उतरती कळा लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार झंझावातात कॉंग्रेस भरकटली. त्या प्रतिकूल वातावरणात राहुल गांधी यांना मोठे कष्ट उपसावे लागले. आज कॉंग्रेस पक्षासाठी त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. कॉंग्रेसमध्ये सध्या तडाखेबंद भाषण करणारा नेता पुढे येत नसल्याने राहुलच हे काम करीत आहेत. कॉंग्रेसची मोठी भिस्त राहुल गांधी यांच्यावरच आहे, असे दिसते. राहुल यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर मांडलेले मुद्दे जनतेच्या लक्षात येतील, असे दिसते. कारण लोक जास्त काळ आश्वासने ऐकत बसत नाहीत. त्यांना ठोस कामाची अपेक्षा सरकारकडून असते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांना तसे यशही येत आहे. अनेक लोक कॉंग्रेसच्या या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे.
कॉंग्रेस हा एकेकाळी राष्ट्रीय पक्ष होता, तो आता पुन्हा जनताभिमुख होत आहे. त्यामुळे लोक पुन्हा कॉंग्रेसच्या विचारांकडे आकर्षित होत आहेत. तसेच कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक या महिन्यात होत आहे. त्यामुळे पक्षात घराणेशाही नाही, असा संदेश जाऊ शकतो. कॉंग्रेस यानिमित्ताने क्रियाशील झाली असून कॉंग्रेसकडे अनेक जणांचा ओढा आहे. राहुल गांधी हे पक्षातील स्टार प्रचारक ठरू शकतात आणि कॉंग्रेसला यश मिळू शकते, हा आत्मविश्वास राहुल गांधी यांनी म्हैसूरमधील सभेच्या निमित्ताने दाखवून दिला आहे. कॉंग्रेस पक्षातून होणारी गळती वाढत असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांत येत आहेत.
शरद पवार यांनी साताऱ्यात पावसात सभा घेतली, तोपर्यंत कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे विधानसभा निवडणुकीत पानिपत होणार, असे म्हटले जात होते. परंतु पवारांनी घेतलेल्या त्या सभेचा सकारात्मक परिणाम मतदारांवर झाला होता. परंतु त्यावेळी विधानसभा निवडणूक सुरू होती. आता कोणतीही निवडणूक सुरू नाही. त्यामुळे याचा प्रभाव 2024च्या लोकसभेपर्यंत टिकणार का, असाही प्रश्न आहेच. यासाठी कॉंग्रेसच्या प्रयत्नांमध्ये सातत्य हवे. कॉंग्रेसचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे, हा पक्ष अनेकवेळा खोल
गर्तेत गेला आणि सावरलाही! सोनिया गांधी जेव्हा राजकारणात आल्या, त्यावेळी कॉंग्रेसमध्ये प्रतिकूल परिस्थिती होती; परंतु नंतर कॉंग्रेस यथावकाश सावरली. 2014 साली मोदी लाटेमुळे अनेक पक्षांची वाताहत झाली होती, त्याचा फटका कॉंग्रेसलाही बसला.
कॉंग्रेसमधून बाहेर जाणारे अनेक नेते ज्येष्ठ आहेत. त्यांना वाटते की, कॉंग्रेस सोडल्यानंतर त्यांना अधिक प्रगती करता येईल. परंतु तसे होणे नाही. जे नेते पक्षात आपला करिश्मा दाखवू शकले नाहीत, ते दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काय चमत्कार दाखवणार? असो. राजकारणात जिकडे जय तिकडे सर्वांची पावले पडतात. मात्र, आता हे प्रमाण वाढले आहे. आपण देशाला चांगले दिवस दाखवू शकतो, पक्षाला मोठे करू शकतो ही भावना नष्ट होत चालली आहे. तसेच अनेक जण स्वाभिमान गहाण ठेवत सत्ताधारी पक्षांकडे पलायन करण्यात धन्यता मानत आहेत. असो. या प्रतिकूल परिस्थितीत राहुल गांधी निर्धाराने सत्ताधाऱ्यांशी लढत आहेत, हेच खूप सकारात्मक आहे. सातत्याने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला यश हे मिळतेच, परंतु त्यासाठी काही कालावधी जावा लागतो.
मध्यंतरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले होते की, देशात फक्त एकच मोठा पक्ष राहील. परंतु लोकशाहीप्रणीत देशात तसे होत नाही. लोक खूप संवेदनशील असतात. ते बऱ्यावाईट घटनांचा बारकाईने अभ्यास करतात. त्यामुळे जनतेला गृहीत धरणाऱ्या नेत्यांना त्यांचे स्थान कुठे आहे, ते कळून येते. हीच लोकशाहीची ताकद आहे. राहुल यांची पावसातील सभा अनेकांना ऊर्जा देऊन गेली, हे वेगळे सांगायला नको.