हिमांशू
प्रसिद्ध नाट्यलेखक हेमंत एदलाबादकर यांची “सत्यम् शोधम् सुंदरम्’ नावाची एकांकिका काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजली होती. सत्याचा शोध घेण्यासाठी, सत्याचं स्वरूप आणि अवस्था जाणून घेण्यासाठी दोन प्रवासी बाहेर पडतात आणि त्यांना सत्याची आगळीवेगळी रूपं दिसतात. उदाहरणार्थ, “आभासी सत्य’ नावाचा सत्यासारखा दिसणारा असत्याचा प्रकारही त्यांना सापडतो. “सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या देशात, आजन्म सत्याचे प्रयोग करणाऱ्या गांधीजींच्या देशात आज खरोखरच सत्याची अवस्था शोधण्याची परिस्थिती आलीय का? “मुख्यमंत्री कोण होणार,’ या प्रश्नापासून सुरू झालेल्या सत्तानाट्याच्या क्लायमॅक्सचा प्रवेश जेव्हा “खोटं कोण बोलतंय,’ या प्रश्नानं गाजला, तेव्हा आम्हाला या एकांकिकेची तीव्रतेनं आठवण झाली.
विशेषतः त्यातल्या “राजकारणी सत्या’च्या प्रवेशाची! लहान मुलाला राजकारणाचे धडे देणारा बाप त्याला शीर्षासन करायला लावतो आणि “पडल्यास मी धरेन,’ असं आश्वासन देतो. ते न पाळल्यामुळे मुलगा धाड्कन पडून रडू लागतो, तेव्हा राजकारणात स्वतःच्या बापावरसुद्धा विश्वास ठेवायचा नसतो, हे सत्य बाप मुलाला सांगतो. दुखावलेला मुलगा बापाचे दिल्लीला जाण्याचे विमानाचे तिकीट लपवून ठेवतो आणि या फजितीची परतफेड करतो. शुक्रवारी दुपारी साडेचारपासून रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात जे-जे घडत गेले, ते पाहताना असे नाट्यप्रसंग आठवणे अत्यंत स्वाभाविक आहे. टीव्ही चॅनेल्सच्या कॅमेऱ्यांनी एकाच दिवसात, एकाच शहरात इतका प्रवास बऱ्याच दिवसांनी केला.
गुडघाभर पाण्यात उभे राहून, वाया गेलेली पिके हातात घेऊन डोळे गाळणारा शेतकरी सरकार स्थापनेची वाट पाहून थकला. काही दिवसांपूर्वीच तो मतदार”राजा’ होता. या राजाने आदेश दिला, त्याला चांगला पंधरवडा उलटून गेला. हा आदेश “महा’ नसला तरी महाराष्ट्राचा आहे. त्याचे पालन करणे भाग आहे. परंतु ते कसे करायचे, याची चाचपणी आणि ओढाताण करण्यात पंधरा दिवस उलटले. विधानसभेची मुदत संपून गेली आणि राजीनामा देऊन मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले. मित्रपक्षावर अप्रत्यक्षपणे खोटारडेपणाचा आरोप केला. याच आरोपामुळे व्यथित झाल्यामुळे आपण चर्चेची दारे बंद केली, असे सांगून मित्रपक्षाने पलटवार केला आणि राजकारणाचा केंद्रबिंदू भलतीकडेच सरकू लागला. (म्हणजे, असे चॅनेलवाल्यांनी सांगायला सुरुवात केली!) कुणी म्हणाले “महाशिवआघाडी’… कुणी म्हणाले “महासेनाआघाडी’…! तीन पक्षांचे संभाव्य एकत्रीकरण.
तीनपैकी एकाही पक्षाच्या नेत्याने या शक्यतेला दुजोरा दिला नाही, तरी “आता हेच घडणार’, “आता हाच एकमेव तोडगा’ असे टीव्हीवरून वारंवार ऐकू येऊ लागले. कुणाची भूमिका महत्त्वाची, कोण किंगमेकर, कुणाच्या हातात सत्तेची चावी, अशा चर्चा रंगत गेल्या आणि सत्तेतल्या दोन मित्रांमध्ये नेमके काय ठरले होते, हा विषय पुन्हा बॅकसीटला जाऊन पडला.
कोण कुणाविषयी काय बोलले, कुणी कुणावर टीका केली, टीका करणाऱ्यांसोबत इतरत्र कुणी सरकारे बनवली, कुणी चांगले शब्द वापरले, कुणी वाईट शब्द वापरले, कुणी शब्द बदलले, कुणी शब्दांचे अर्थ बदलले, असे बरेच काही अवघ्या तीन-चार तासांत ऐकायला मिळाले आणि प्रश्न पडला “सत्य’ कुठे आहे? ते कसे शोधायचे? क्षणाक्षणाला डोळ्यासमोर “न्यूज फ्लॅश’ येत-जात राहिले आणि अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याचे “भयाण सत्य’ आपोआप नजरेआड गेले.