– हिमांशू
चर्चेचा विषय आहे- वाघ! वाघ हा जंगलात राहणारा चतुष्पाद प्राणी असून, पाळीव प्राण्यांमध्ये त्याची गणना होत नाही. वाघ पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्याच्या अंगावर पट्टे असतात. जाणकार मंडळी वाघाला अन्नसाखळीचे शिखर म्हणजे “अपेक्स ऍनिमल’ मानतात. वाघ पूर्वीप्रमाणे हल्ली सर्कशीत दिसत नाही.
परंतु अत्यंत हिंस्र मानला जाणारा हा प्राणी केवळ चाबकाचा आवाज ऐकून घाबरत असे आणि स्टुलावर जाऊन बसत असे. आगीने वेढलेल्या रिंगमधून तो उडी मारायचा, असेही सांगितले जाते. परंतु आज हे कोणास खरे वाटत नाही. चाबकाच्या फटकाऱ्याला घाबरणारा पिंजऱ्यातला वाघ इतिहासजमा झाल्याचे सांगितले जाते.
म्हणजे तो बिबट्यासारखा बेधडक मानवी वस्तीत येऊ लागला, असे नव्हे. मानवी वस्तीत गल्लीबोळात, टप्प्याटप्प्यावर अनेक “मानवी वाघ’ असल्याने जंगलातील वाघ शहरात येण्याचे टाळतो. दुबईत की कोठेतरी वाघास पाळतात आणि कुत्र्याप्रमाणे साखळी घालून फिरायला नेतात, असा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतो.
तिबेटमध्येही काहीजण मांजराला खेळवल्याप्रमाणे वाघास खेळवतात, अशी दृश्ये यू-ट्यूबवर दिसतात. सिंगापूर वगैरे ठिकाणीही पर्यटक वाघास बेधडक हात लावू शकतात, असे सांगितले जाते. महाराष्ट्रात मात्र वाघाला हिंस्र म्हणावे की नाही, यावरील चर्चेस नुकतेच तोंड फुटले आहे. त्याचप्रमाणे वाघाशी मैत्री करावी का, याविषयीही उलटसुलट मते मांडली जात आहेत.
काही दिवसांपूर्वी “वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत,’ असे वक्तव्य ऐकू आल्याबरोबर कॉंक्रिटच्या जंगलात खळबळ उडाली होती. तथापि, दोस्तीचे हे गुपित महाराष्ट्राला अद्याप समजू शकलेले नाही. वाघाशी संबंधितांची दोस्ती होती; परंतु ती तुटण्याचे कारण कुणालाच उमगले नाही. वाघ जखमी झाल्याचे सांगितले जात होते;
परंतु “वाघास आम्ही जखमी केले नाही,’ असेही ऐकू येत राहिले. अखेर एके दिवशी पहाटेच्या मुहूर्तावर या दोस्तीला तिलांजली देण्यावर शिक्कामोर्तब झाले. आता पुन्हा एकदा दोस्ती करण्याचा प्रस्ताव आला तरी वाघास झालेली जखम अद्याप भरलेली नाही, असेच दिसून येते.
“कोणाशी मैत्री करायची, हे वाघच ठरवीत असतो,’ असे उत्तर दिले गेले आणि वाघाचे दोस्त बदलले तरी मूळ रूप कायम आहे, असे सांगून दोस्तीचा प्रस्ताव झिडकारला गेला. मात्र, “आमची मैत्री जंगलातल्या वाघाशी होती. तो आता पिंजऱ्यातील वाघ बनला आहे,’ अशा शब्दांत त्यास प्रत्युत्तर मिळाले.
मुहूर्त वाढदिवसाचा असल्यामुळे दोन्हीकडून गोडीतच सुरू होते आणि या सर्व घडामोडींवरून वाघही गोड बोलू शकतो, हे सिद्ध झाले आहे. तेवढ्यात नाक्यावर उभे राहणारे टपोरीही स्वतःस वाघ म्हणवून घेतात, याचीही आठवण करून देण्यात आली.
एकंदरीने वाघाची सद्यःस्थिती आणि त्याची मैत्री याविषयी विविध मतांतरे आढळून येतात. परंतु वाघाचा कायमस्वरूपी रहिवासाचा पत्ता नाका हा नसून अजूनही जंगल हाच असावा, असे तिथे होणाऱ्या शिकारींवरून दिसून येते.
जंगलातील वाघास उत्पन्नाचे साधन बनवणारे दोन जण चंद्रपुरात नुकतेच सापडले यावरून जंगलचा वाघ अद्याप मौल्यवान असावा, असेही स्पष्ट होते. शिकाऱ्यांकडे वाघाची नखे, मिशा, दात आढळले असून, याविषयी मात्र “वाघ’ हा वादविषय बनविणारे काहीच बोलत नाहीत.