सुबोध, सुंदर व खोचक लिहावे तर ते अत्र्यांनीच!
पुणे, ता. 13 – ज्याला सुबोध, सुंदर, खोचक लिहिण्याची इच्छा असेल, त्याने आचार्य अत्रे यांचे साहित्य वाचावे, असे प्रा. श्री. के. क्षीरसागर यांनी सांगितले. आचार्य अत्रे स्मृती समितीच्या वतीने आज साहित्य परिषदेच्या सभागृहात भरलेल्या सभेत अध्यक्षस्थानावरून ते भाषण करीत होते.
आचार्य अत्रे यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त ही सभा भरली होती. क्षीरसागर म्हणाले, “आचार्य अत्रे यांनी वृत्तपत्रीय लेखनांत विक्रम करून दाखविला आहे.’ गोपीनाथ तळवलकर म्हणाले, “आचार्य अत्रे म्हणजे आनंदमूर्तीच होती.
जेथे जेथे ते गेले, तेथे तेथे त्यांनी आनंद निर्माण केला. जनमनाची नाडी हातात घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात फार मोठे होते.’ मधुकर जोशी म्हणाले, “आचार्य अत्रे फाउंडेशनच्या वतीने आचार्यांचा अर्धपुतळा महानगरपालिकेस अर्पण करण्यात येईल आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात बसविण्यात येईल.
“देवी’ रोग नष्ट करण्याचा संकल्प
पुणे – “देवी’ हा रोग 1974 सालात नष्ट करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आरोग्य सेवासंघ विभागाचे साहायक संचालक श्रीकृष्ण भडकमकर यांनी आज येथे सांगितला. ते म्हणाले, देवीचा रोग महाराष्ट्रात कमी होत आहे.
1967 साली 27961 लोक या रोगाने पछाडले होते व त्यात 5113 मृत्यू पावले होते. देवी निर्मूलन योजनेच्या कार्यामुळे 1972 साली 314 लोकांना देवीची लागण झाली होती व मृत्यू संख्या 46 होती. तर चालू साली केवळ 8 लागण होऊन 10 मृत्यू झालेले आहेत.
तथापी 1974 साली एकही लागण होऊ नये असा सरकारचा निर्धार आहे. यासाठी देवीची झालेली लागण ताबडतोब शोधून त्याची खबर देणाऱ्यांना यापुढे 25 रु. पारितोषिक देण्याची योजना आहे व त्या खबरीनुसार ती लागण देवीचीच सिद्ध झाली तर त्या नागरिकाला अधिक 5 रु. जादा बक्षिस दिले जाईल, असेही भडकमकर म्हणाले.