आपण अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलो नाही, हे कोविडच्या साथीने आपल्याला शिकवून काही महिनेच उलटलेत आणि आपण तो काळ जबरदस्तीने विसरू पाहतोय. “कोविडने खूप काही शिकवलं’, असं आपण काही महिन्यांपूर्वीच म्हणत होतो, हे आज आपल्याला आठवतसुद्धा नाही. कारण आपल्या भोवताली जे काही घडतंय, त्यावरून आपण कोविडकाळात काही शिकलो आहोत, असं अजिबात म्हणता येत नाही.
समाजात वाढलेली आक्रमकता आणि गैरलागू मुद्द्यांवरची बाष्फळ भांडणं पाहून आपल्याला कुणीही, कधीही, कसंही खेळवू शकतं, याची खात्री पटत चाललीय. कोविडकाळात बंद घरात बसून आपण बरंच चिंतन वगैरे केलं. कारण दुसरं काहीच करता येत नव्हतं. लॉकडाऊनमुळे प्रगतीची चाकं थांबली; पण विचारांची चक्र फिरू लागली. प्रगतीच्या ओघात आपण कुठून कुठपर्यंत आलो आणि किती ठिकाणी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला, याबद्दल कोविडकाळात बोललं गेलं. समोरासमोर नाही… सोशल मीडियावर..! असं वाटलं, आता कळलं आपल्याला जगण्याचं मर्म..!
केवळ अत्यावश्यक गोष्टीच मिळत होत्या आणि त्यालाही मर्यादा होती. टेलिव्हिजन होता; पण त्याचे कॅमेरे बकवास लोकांच्या मागे फिरून टीआरपी गोळा करू शकत नव्हते. केवळ रुग्णांचा वाढत चाललेला आकडा सांगावा लागत होता. एकंदरीत, आपण आक्रमक न होता, शांत राहून, कमीत कमी खर्चात चांगले कसे जगू शकतो, हे आपल्याला कोविडकाळाने शिकवलं; पण…”रात गई, बात गई’ या उक्तीनुसार कोविडकाळानंतर पुन्हा वळणाचं पाणी वळणावर गेलं. या काळात अनेकांनी आपले आप्तस्वकीय, मित्र गमावले.
फुफ्फुसात सहजगत्या जाणारा श्वास किती क्षणभंगूर आहे हे कळलं… पण वळलं नाही! आपण खरोखर काटकसरीनं जगू शकतो का? किंबहुना ही बाजारपेठ आपल्याला तसं जगू देईल का? याचं उत्तर दुर्दैवानं नकारार्थीच मिळालंय. एका सर्वेक्षणानुसार जगभरात विशेषतः युवा वर्गाचा खर्च करण्याकडे कल वाढलाय. पूर्वी बचत करणारे लोक आता तुलनेनं कमी बचत करतायत आणि उधळपट्टी अधिक करताहेत, असं हे सर्वेक्षण सांगतं. जगण्यातली क्षणभंगुरता कोविड काळात दिसली; पण ती वेगळाच परिणाम करून गेली, असं
म्हणायला हवं.
ताज्या सर्वेक्षणात असं दिसून आलंय की, कोविडपाठोपाठ रशिया-युक्रेन युद्ध, वाढत चाललेली महागाई, अस्थिरता आणि हवामान बदलामुळे झालेले परिणाम यामुळे युवा पिढी भविष्याचा विचार पूर्वीसारखा करत नाहीये. उलट जेवढे पैसे हातात येतील, ते उधळून आपल्या आवडीनिवडी जोपासणं चाललंय. पैसे वाचवणं आणि बॅंकेत ठेवणं किंवा शेअर बाजारात गुंतवणं याऐवजी “जगून घ्या’ म्हणत ते उधळण्याचा ट्रेन्ड पाहायला मिळतोय. शीतयुद्धाच्या आणि जागतिक महामंदीच्या काळातसुद्धा असाच ट्रेन्ड दिसून आला होता.
उदारीकरणामुळे पुढच्या पिढ्यांसाठी कमावून ठेवण्याची प्रवृत्ती वाढली. किती कमावल्यावर ते “पुरेसं’ ठरेल, याचं उत्तर कुणालाच देता येईना. घेता येईल तेवढा उपभोग घेऊ आणि उरलेलं पुढील पिढीसाठी ठेवू, असा विचार करणारा नवश्रीमंत वर्ग तयार झाला. सुबत्ता आली आणि समाधान संपलं. पुढच्या पिढीसाठी पैसा साठवणाऱ्या तुम्ही-आम्ही त्याच पिढीसाठी पर्यावरण मात्र राखलं नाही. आता पुढची पिढी म्हणतेय, “उद्या कुणी पाहिलाय?’ हा काळानं उगवलेला सूड तर नसेल?
हिमांशू