पुणे – यंदा सुमारे 18 राज्यांत मान्सूनपूर्व पाऊस झालेलाच नाही. मंगळवारी (दि.16) रोजी दिल्लीत झालेली 49 अंश सेल्सियस तापमानाची नोंद, हा त्याचाच परिणाम आहे. मागील काही वर्षांतील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण पाहता, यंदा महाराष्ट्रात 78 टक्के तूट निर्माण झाली आहे. तर, काही राज्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे.
पूर्वमोसमी स्थितीत यंदा विशेषत: आसामला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. तर, कोची आणि तिरुअनंतपूरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या चेरापुंजी येथे पूर्वमोसमी पावसाचे सरासरी प्रमाण 1723 मिमी असते. पण, यंदा आतापर्यंत तब्बल 3280 मिमी पावसाची नोंद झाल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे तूट असली, तरी दुसरीकडे या पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पावसाचे असमान वितरण हा चिंतेचा विषय आहे.
*पूर्वमोसमी पाऊस लांबल्याने उष्णतेत वाढ
*महाराष्ट्रात 78 टक्के कमी पावसाची नोंद
*आसाम, केरळमध्ये जनजीवन विस्कळीत