हिमांशू
“ओमायक्रॉन’ वाढतच चाललाय… राज्यात, देशात, जगात! कुणी म्हणतोय जानेवारीत मोठी लाट येणार तर कुणी लहान मुलांना जपायचा सल्ला देतोय. कुणी सांगतोय, लसीचे दोन डोस घेतले असले तरी नवा व्हेरिएंट लसींना पुरून उरतोय. कुणाच्या मते हा फारसा घातक नाही; पण वेगानं फैलावतोय म्हणून काळजी घेतली पाहिजे.
कुणी म्हणतो, आता काळजी वगैरे घ्यायचं काही कारणच नाही. लॉकडाऊन हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी घोषणा देत रस्त्यावर उतरायची तयारी अनेकांनी केलीय. राज्यातले धोरणकर्ते टास्क फोर्सशी आणि केंद्रातल्या धोरणकर्त्यांशी सातत्यानं सल्लामसलत करताहेत.
निर्बंध लावायचे की नाही? लावले तर किती आणि कसे लावायचे? अशी रोजची खलबतं सुरू आहेत. आज इकडे, उद्या तिकडे रुग्ण सापडल्याच्या बातम्या आणि पुनःपुन्हा तेच ते रोगट वातावरण! या नव्या डोकेदुखीमुळे जवळजवळ प्रत्येकाची चिडचीड होतेय.
अनेकांना तर “ओमायक्रॉन’ हे नावच आवडलेलं नाहीये. आमच्या एका मित्राला आधी हे ऍसिडिटीच्या गोळीचं नाव वाटलं होतं. न दिसणाऱ्या विषाणूंची आणखी किती नावं पाठ करायची? आणखी किती लाटा येणार आहेत? हे सगळं कधी संपणार आहे की असंच सुरू राहणार आहे? आपण विषाणूयुगात तर प्रवेश केला नाहीये ना? पृथ्वीवर सर्वप्रथम हेच “सजीव’ अवतरले होते म्हणतात! त्यांचंच साम्राज्य पुन्हा येणार की काय?
डोक्यातले प्रश्न वाढत जाऊन कोणत्या टोकाला पोहोचतील, सांगता येत नाही. वातावरणच तसं आहे. फक्त प्रश्नच आहेत आणि अचूक उत्तर द्यायला सध्या तरी कुणीच सक्षम दिसत नाही. परंतु आपण विषाणूयुगात प्रवेश केला असावा, या शंकेला ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या डेम सारा गिल्बर्ट यांनी दुजोरा दिलाय. अर्थात, कोणत्या विद्यापीठातल्या कोणत्या व्यक्तीला “तज्ज्ञ’ म्हणायचं, हा बेसिक प्रश्न आहेच!
बहुधा आपल्यातल्या प्रत्येकाला आपल्यासारखा विचार करणारी व्यक्ती तज्ज्ञ वाटू लागली असावी. विषाणूयुग अवतरल्याचं स्वप्न आम्हाला पहिल्या लॉकडाऊनपासून पडतंय. न दिसणारे विषाणू हॉलीवूडच्या चित्रपटांप्रमाणं डोळ्यांसमोर नाचताहेत. परंतु डेम सारा गिल्बर्ट जे सांगताहेत, ते स्वप्न नव्हे. त्यांच्या मते, ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यामुळे गंभीर आजाराचा किंवा मृत्यूचा धोका अधिक आहे असं नव्हे; परंतु हा लसींना दाद न देणारा विषाणू आहे हे नक्की. भविष्यात असेच आणखी विषाणू निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ओमायक्रॉन धोकादायक नसला तरी पुढच्या पिढीचे विषाणू भयानक असू शकतात.
गिल्बर्ट यांच्या म्हणण्यानुसार, करोना हा शेवटचा विषाणू नाही. त्यानंतर येऊ शकणारे संसर्ग याहून मोठे असण्याची शक्यता आहे आणि आपल्याला करोनापेक्षा घातक विषाणूंशी लढायचं आहे, हे ध्यानात घेऊनच तयारी करावी. नुसतं ऐकलं तरी तळपायाची आग मस्तकाला भिडते, होय ना? आजमितीस हा विषाणू कुणालाच पूर्णपणे कळलेला नसावा असंच चित्र आहे.
परंतु विषाणू एका पाठोपाठ एक येताहेत आणि ते कमी-अधिक प्रमाणात घातक आहेत, ही गोष्ट खरी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करू शकेल अशी यंत्रणा तयार करणं आणि मुख्य म्हणजे विषाणू आसपास आहे, हे गृहित धरून जीवनशैली बदलणं या गोष्टींना पर्याय राहिलेला नाही, एवढं खरं!