पुणे- रिक्षाचालकांची भाडेवाढ झाल्यानंतर रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन करणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील रिक्षांच्या संख्येच्या तुलनेने कॅलिब्रेशननंतर तपासणी झालेल्या रिक्षांची संख्या निम्म्याहून कमी असल्याचे चित्र आहे.
22 नोव्हेंबरपासून रिक्षांच्या भाडे दरात वाढ करण्यात आली. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी सुधारित 21 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. या सुधारित दरांनुसार मीटरचे प्रमाणीकरण (कॅलीब्रेशन) आवश्यक आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जानेवारी 2022 अखेरची मुदत दिली आहे.
कर्वेनगर, फुलेनगर, रामटेकडी, दिवे, खराडी या ठिकाणी प्रमाणीकरण झालेल्या रिक्षांची तपासणी करण्यात येते. सध्या प्रमाणीकरण करणाऱ्या रिक्षांची संख्या तुलनेने कमी आहे. तर तपासणीसाठी ठराविक रिक्षा तपासणी केंद्रांवरच गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुमारे 72 हजार रिक्षा आहेत. तर प्रमाणीकरणनंतर तपासणी झालेल्या रिक्षांची संख्या 20 हजारांपर्यंत पोहोचली आहे.
“रिक्षाचा ट्रॅक असणाऱ्या ठिकाणी स्थानिकांकडून वाहतुकीला अडथळा असल्याने विरोध करण्यात येतो. यासह मुंबईमध्ये दरतक्ता वापरण्याला परवानगी आहे. पण पुण्यात प्रमाणीकरण केलेल्या रिक्षाचालकांनाच दर वाढवता येतात. त्यामुळे त्यातही गोंधळ होत असल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर दर तक्ता किंवा ऍप वापरण्याची परवानगी मिळावी,’ असे रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार म्हणाले.
रिक्षाचालकांकडून लवकरात लवकर प्रमाणीकरण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, रिक्षा प्रमाणीकरण झाल्यानंतर एखाद्याच ट्रॅकवर रिक्षाचालक गर्दी करत आहेत. गर्दी न करता रिक्षाचालकांनी प्रमाणीकरण करून उर्वरित केंद्रांवर देखील जाणे आवश्यक आहे. हे रिक्षाचालकांसाठीदेखील सोयीचे ठरणार आहे
– बापू भावे, रिक्षा फेडरेशन