– हिमांशू
एखाद्या कारणामुळे जेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा एक सूचना प्रशासनाकडून हमखास मिळते. “अफवांवर विश्वास ठेवू नका.’ ही सूचना माहिती तंत्रज्ञानाच्या युगातली नाही. फार पूर्वीपासून दिली जातीये. खरं तर इतकी भंपक सूचना कुणीच कुणाला देऊ नये. कारण, आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे की अफवा, हे ठरवायचं कसं? “कोणत्याही माहितीची शहानिशा केल्याखेरीज विश्वास ठेवू नका,’ अशी हवी ना सूचना! पण आपण अशा बारीकसारीक चुका कायमच करत राहिलो आणि तसेच फरफटत माहिती तंत्रज्ञानाच्या युगात येऊन ठेपलो. आता तर माहितीचा कल्लोळच झालाय. इतक्या माहितीचं करायचं काय?
असा प्रश्न पडावा अशी स्थिती! बरं, त्यात उपयुक्त माहिती किती आणि भर्ताड किती? याही प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहितीये. हल्ली हा प्रवास “उपयुक्त की भर्ताड’ याच्याही पुढे जाऊन “उपयुक्त की अपायकारक’ इथंवर जाऊन पोहोचलाय. तिकडे इस्रायल आणि पॅलेस्टाइन युद्धात जे काही चाललंय, त्याला “इन्फर्मेशन वॉरफेअर’ असं आकर्षक नाव दिलं जातंय. म्हणजे, नक्की काय चाललंय हे पडद्याआडच आहे आणि न घडलेल्या घटनांना प्रसिद्धी दिली जात असल्याचा आरोप होतोय. इकडे “डीप फेक’ नावाचं नको असलेलं तंत्रज्ञान अभिनेत्रींपासून पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांना धक्के देत सुटलंय. रश्मिका मंदाना नावाच्या अभिनेत्रीचा लिफ्टमधला जो व्हिडिओ व्हायरल झालाय, तो तिचा नाहीच हे खूप उशिरा समजलं.
असाच एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला आणि पंतप्रधान गरबा खेळत असल्याचं दृश्य संपूर्ण देशानं पाहिलं. खुद्द पंतप्रधानांनाच जाहीरपणे त्याचा उल्लेख करावा लागला. “हे तंत्रज्ञान अराजक घेऊन येतंय,’ असं म्हणावं लागलं. एखादा व्हिडिओ खरा की “डीप फेक’ तंत्रज्ञानानं बनवलेला, हे ओळखण्यासाठीही काही कसोट्या आहेत. परंतु शंभरातल्या नव्वद जणांना त्या माहीत नाहीत. अनेकांचं मागासलेपण सोशल मीडियानेच दूर केलेलं असल्यामुळे त्या वाटेनं येणारी सगळी माहिती त्यांना खरीच वाटते. रश्मिकाच्या पाठोपाठ आणखी काही अभिनेत्रींचे तसेच व्हिडिओ समोर आले आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांना स्टेटमेन्ट द्यावं लागलं.
पण हा विषय इथे संपत नाही. इथून सुरू होतो. खुद्द पंतप्रधानांचा “डीप फेक’ व्हिडिओ तयार होत असेल तर आपलं काय, या चिंतेनं ग्रासलेल्या लोकांना दिलासा मिळेपर्यंत हा विषय संपणार नाही. तंत्रज्ञानात काहीही नवं आलं, की ते चांगलंच असं म्हणणारे “सुधारलेले’ लोक तंत्रज्ञानावर आक्षेप घेणाऱ्यांना नेहमी “मागास’ आणि “विकासाचे शत्रू’ ठरवत आलेत. त्यामुळे विरोधाचा सूर लावायचीही चोरी! अशा परिस्थितीत हा प्रवास कुठे जाणार, याचा पत्ताच लागत नाही.
आता पंतप्रधानांनीच “अराजक’ शब्द वापरलाय, त्यामुळे ही गोष्ट सीरिअसली घेतली जाईल, अशी आशा करूया. माहिती तंत्रज्ञान आल्यावर “माहितीचं युग आलं,’ अशी हाकाटी पिटणाऱ्यांनी खरोखरच “इन्फर्मेशन’चं युग आलंय की “मिस्इन्फर्मेशन’चं, याचा शोध घ्यायला काय हरकत आहे? माहिती लवकर कळत नव्हती तो काळ सुखाचा होता, असं म्हणण्याची वेळ येऊ नये, याची दक्षता कोण घेणार? त्रासदायक आणि विघातक तंत्रज्ञानावर बंदी कोण घालणार? या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत सगळंच अवघड आहे!