-हिमांशू
“गुन्हा आमच्या हद्दीत घडलेला नाही,’ हे वाक्य खास पोलिसांसाठी राखीव असण्याचे दिवस सरले. आता राजकीय पक्षांनीही हद्दी आखून घेतल्यात आणि गुन्हा घडला त्या राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं ठरू लागलंय.
विशेष म्हणजे, ज्याला कोणत्याच हद्दी नाहीत अशा इंटरनेटवरून एकमेकांवर शाब्दिक क्षेपणास्त्रं डागली जात असताना त्याच इंटरनेटवरून अवघ्या पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या जातायत. कंगना राणावतच्या ऑफिसवर कारवाई केल्यावर किंवा बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांचं प्रस्थ वाढल्याची माहिती उघड होताच सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारवर तुटून पडायचं.
हाथरसमध्ये बलात्कार पीडितेवर रात्रीच्या अंधारात अंत्यसंस्कार उरकल्याचं लक्षात येतं तेव्हा सर्वांनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरायचं. त्याच वेळी काहीजणांनी राजस्थानमध्ये सर्वाधिक बलात्कार होत असल्याकडे लक्ष वेधून 2019 ची आकडेवारी दाखवायची. मग कुणीतरी 2016 पासूनची आकडेवारी तपासा म्हणायचं. तेवढ्यात झारखंडमध्ये बलात्काराची घटना घडते म्हणून सगळ्यांनी त्या दिशेनं कॅमेरे वळवायचे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पोलीस शिखांच्या पगडीला हात लावतात म्हणून बंगाल सरकारला जाब विचारायचा.
तेवढ्यात राजस्थानातून पुजाऱ्याला जिवंत जाळल्याची बातमी येते म्हणून त्या राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे काढले जातायत यावर चर्चा करायची. चर्चेला मात्र हद्द नाही. कारण चर्चा इंटरनेटवरून चालते. राजकीय नेते ट्विटरवर भांडतात आणि बाकीचे व्हॉट्सऍप अन् फेसबुकवर!
डिजिटल क्रांती झाली खरी; पण ती “स्वस्तात’ मिळाल्यानं माणसाचा निगरगट्टपणा आणि बोथटपणाच वाढत चाललाय. 2012 मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणातल्या आरोपींना साडेसात वर्षांनी फाशी झाली आणि हैदराबादमधल्या तरुणीवर अतिप्रसंग करून तिचा खून करणाऱ्यांचा दोन दिवसांत एन्काउंटर झाला. या दोन्ही परस्परविरोधी घटना डोळ्यांसमोर असूनसुद्धा उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये अशा घटना घडल्या, याचा अर्थ लावण्यात मात्र आपण सगळेजण कमी पडलो.
कायद्याचा धाक नाही, दोषींना लवकर शिक्षा होत नाही, असं म्हणावं तर एन्काउंटरची भीती का वाटत नाही, असा सवाल उभा राहतो. जुलै महिन्यात छत्तीसगडमध्ये उघड झालेल्या घटनेत 17 वर्षांच्या मुलानं पाच वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करून तिला विहिरीत ढकलून मारलं होतं आणि तिच्या सहा वर्षांच्या भावाचाही गळा आवळला होता. राजस्थानमधल्या ताज्या घटनेत पुजाऱ्याला पेट्रोल ओतून पेटवलं गेलं. हे क्रौर्य कुठून येतं, याचा विचार न करता आपण हद्दींवरून भांडत राहिलो, तर ही आग आपल्या घरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. “हैवानांच्या हद्दीतून माणसांच्या हद्दीत आलेल्या’ या घटना आहेत, एवढाच विचार आपण करायला हवा. हे क्रौर्य माणसांच्या हद्दीतून तडीपार करायला हवं.
आपल्याकडे राजकारण हे सर्वाधिक बदनाम क्षेत्र मानण्याची प्रवृत्ती पूर्वीपासूनच होती. आज मात्र कोणत्याही घटनेचा संबंध थेट राजकारणाशी जोडून लोक सोशल मीडियावर एकमेकांना शिव्याशाप द्यायला तयारच असतात. राजकारणाविषयीची ही “अतिरिक्त सजगता’ राजकारण्यांच्या पथ्यावर पडणारी आणि आपल्याला खड्ड्यात घालणारी आहे. ती थोडी कमी केल्यास आपण माणूस म्हणून आपली हद्द सोडून किती पुढे गेलो आहोत, याचं भयावह दर्शन आपल्याला घडेल. आपण या अवनतीची खरी कारणं शोधायला लागू… इस्कोट होण्याआधी!