नवी दिल्ली – एका धार्मिक धर्मांतराच्या कार्यक्रमावरून निर्माण झालेल्या वादानंतर मंत्रीपदाचा राजीनामा देणारे आप ( AAP ) पक्षाचे नेते राजेंद्र पाल गौतम यांनी सोमवारी देशातील दलितांवरील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केली. त्याचबरोबर त्यांनी नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
उत्तरप्रदेशात दलितांवर अत्याचाराच्या वाढत्या घटना घडत असल्याने त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनीही राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले की आपल्यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या ( AAP ) सरकारला भाजपकडून हिंदु विरोधी ठरवले जात आहे, त्यामुळे आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ केला आहे. हे त्यांनी या आधीच स्पष्ट केले आहे.
त्यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही. गौतम यांनी देशात दलितांवरील अत्याचाराची जबाबदारी पंतप्रधान मोदी स्वीकारणार आहेत की नाही असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी सर्वणांकडून एका दलित व्यक्तीला मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओही शेअर केला आहे.