महाबळेश्वर -महाबळेश्वरमधील रंगीबिरगी चपला पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे यावेळच्या पर्यटन हंगामात पर्यटकच नसल्याने चर्मकार कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने चर्मकार समाजासाठी असणाऱ्या महामंडळाच्या माध्यमातून चर्मकार कारागिरांना सावरण्याचे काम करावे, अशी मागणी निवेदनाव्दारे चर्मकार समाजाने केली आहे.
स्थानिक कारागिराने तयार केलेल्या आकर्षक रंगीबेरंगी व आधुनिक फॅशनच्या चपला बाजारपेठेत आलेल्या प्रत्येक पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडतात. ब्रिटीश काळापासुन महाबळेश्वरच्या चपला प्रसिध्द आहेत. चपला तयार करणारे येथे साधारण 300 ते 400 चर्मकार कारागिर आहेत. करोनाने मात्र या सर्वांचा रोजगार गिळंकृत केल्याने या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या स्थितीतून त्यांना सावरण्यासाठी येथील चर्मकार समाजाने शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
वाई तालुक्यातील पांडेवाडी, बावधन, पसरणी तसेच भोर व खंडाळा तालुक्यांतील चर्मकार समाज दरवर्षी रोजगारासाठी महाबळेश्वर येथे येत असे. ऑक्टोंबर ते मे असे आठ महिने व्यवसायातून कमाई करून चार महिने पावसाळयात तो पुन्हा आपल्या मूळ गावी जात असे. दिवसभर घरी चपला तयार करून त्या सायंकाळी बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला मांडून आपला उदरनिर्वाह चालवित असे. यातील काही लोकांनी बाजारपेठेत दुकाने थाटली असली तरी आजही हातावर पोट असलेल्या कारागिरांची संख्या मोठी आहे. आजही तो दिवसभर घरी चपला तयार करून रस्त्यावर बसून विक्री करीत असतो.
करोनामुळे हातावर पोट असलेल्या चर्मकार कारागिरांचा रोजगारच हिरावला गेला आहे. देशात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच महाबळेश्वर पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते.
त्यामुळे महाबळेश्वर दोन महिन्यांपासून बंद आहे. या स्थितीमुळे अनेकांचा रोजगार गेला. यामध्ये चर्मकार समाजाचासुध्दा समावेश आहे. दुकानदार चर्मकारदेखिल बॅकेच्या कर्जात बुडाला आहे. व्यवसायासाठी घेतलेले कर्ज परत फेडणे आता त्याला शक्य होणार नाही. उन्हाळी हंगामात मोठया संख्येने पर्यटक येतात. याच उन्हाळी हंगामात पावसाळ्यातील चार महिन्यांची कमाई करून बॅकेचे कर्ज फेडायचे काम चर्मकार करीत असतात.
परंतु, आता चर्मकार समाज मोठया अडचणीत सापडला आहे. दुकाने बंद, कामगारांचे पगार, बॅकेचे हप्ते सुरू आणि रोजगार बंद तसेच दुकानात असलेला चामड्याचा माल पावसाळयात खराब होऊन चर्मकार समाजाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. अशा बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी चर्मकार समाजाला मदतीचा हात देण्याची आवश्यक्ता आहे. येथील चर्मकार समाजाने सुरेश साळुंखे व विलास काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक घेऊन शासनाकडे मदत मागण्याचा निर्णय घेतला आहे.