नवी दिल्ली – भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा पीक पॉइंट येऊन गेला किंवा नाही, यावरून बरीच मतमतांतरे आहेत. अशातच आता देशात करोनाची तिसरी लाट कधी येणार, याचे अंदाज बांधण्याचे काम सुरू आहे व ती कधी येणार याचे ठाम भाकितेही वर्तवली जात आहेत.
एका विशिष्ट कालावधीत रुग्णांची संख्या अचानक वाढली तर तो पीक पॉइंट समजला जातो. हा टप्पा पार केल्यानंतर रुग्णांची संख्या कमी होण्यास प्रारंभ होतो. सध्या भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा पीक पॉइंट येऊन गेला आहे किंवा नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.
तिसरी लाट येणार किंवा नाही यावर डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांमध्येच बरेच मतभेद सुरू आहेत. कारण कोणत्याही साथीचा प्रकोप नेमका कधी वाढेल, हे निश्चित नसते. त्यामुळे रोगाची एखादी साथ अचानक निघूनही जाते. केवळ पीक पॉइंटच्या काळात रोगाच्या साथीचा प्रभाव प्रचंड असतो. भारतामधील विविध राज्यांमध्ये सध्या करोनाचा कमी-अधिक प्रभाव पाहायला मिळत आहे.
अनेक वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते भारतात करोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्याच्या आसपास तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. ही लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मध्यम स्वरूपाची असेल.
साधारणत: कोणत्याही साथीच्या रोगाची दुसरी लाट ही पहिल्याच्या तुलनेत दुबळी असते. कारण तोपर्यंत लोकांमध्ये रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झालेली असते. मात्र, करोनाच्या विषाणूंमध्ये होणारे म्युटेशन पाहता असा ठाम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे सध्या करोनाला रोखण्यासाठी लस हाच एकमेव उपाय मानला जात आहे.