श्रीकांत कात्रे
राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडणार… सोडणार.. अशी हाळी ठोकलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी काहीच निर्णय जाहीर केला नाही. पण ते राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडणार नाहीत, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे पक्षांतराबाबत त्यांनी राखलेला सस्पेन्स संपला आहे. मात्र, पक्षांतराची चर्चा त्यांनी महिनाभर का तेवत ठेवली, याचा सस्पेन्स कायम आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मुरब्बी समजल्या जाणाऱ्या या नेत्यांनी या चाली का खेळल्या, याची उत्तरे कदाचित आगामी काळातच मिळू शकतील. विधानसभेचे उमेदवारी अर्ज भरण्याची रणधुमाळी सुरू असतानाही रामराजेंनी पाळलेले मौन म्हणजे राजकारणातील मुत्सद्दीपणाचे लक्षण आहे की त्यांची गणिते फसत चालली आहेत, हे येणारा काळच ठरविणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने फलटण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचीच उमेदवारी घोषित केली आहे. त्याअर्थी रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची कास सोडलेली नाही, असे मानण्यात येते. त्यामुळे महिनाभर रामराजे दाखवत असणारी भूमिका म्हणजे त्यांच्या मनातील घुसमट होती की सर्व पक्ष आणि नेत्यांना आपल्या उपयुक्त मूल्यांची जाणीव करून द्यायची होती, हे स्पष्ट होत नाही. राजघराण्याचा वारसा घेऊन रामराजे 1991 मध्ये राजकारणात सक्रिय झाले.
मालोजीराजे नाईक निंबाळकर यांची राजकीय कारकीर्द डोळ्यासमोर ठेवून आपले बंधू रघुनाथराजे व संजीवराजे यांना बरोबर घेत फलटणच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण केला. फलटणमधून 1995 मध्ये अपक्ष म्हणून विजयी झालेल्या रामराजे यांनी मतदारसंघ राखीव होईपर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. अपक्ष असो किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असो, सत्तेत राष्ट्रवादी कॉंग्रेस नसेल तरीही सत्तेने रामराजेंना कधीच सोडले नाही.
कृष्णा खोऱ्याच्या उपाध्यक्षापासून राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत आणि सध्या असणाऱ्या विधानपरिषदेच्या सभापतिपदापर्यंत सत्ता त्यांच्या सोबत राहिली. फलटण तालुक्यातील सर्वच सत्तास्थाने त्यांच्या गटाकडे राहिली. जिल्ह्याच्या राजकारणाची सुत्रे त्यांच्याकडे राहिली. असे सारे असताना पक्षांतराच्या चर्चेचे पिल्लू कसे बाहेर आले आणि त्यामागचा हेतू काय होता आणि अखेर ते आहे त्याच घरात आहेत. हे सारे गौडबंगाल वाटण्याइतपत घडत गेले. या घडामोडींतून त्यांचे जावई राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाली. फलटणमधून त्यांचेच समर्थक दीपक चव्हाण पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनच रिंगणात येत आहेत. हे सारे कौशल्य केवळ रामराजेच सिद्ध करून शकतात.
खरं तरं जिल्हा परिषदेची, जिल्हा बॅंकेची सत्ता त्यांच्याकडेच होती. आहे. स्थानिक राजकारणातील बेरीज वजाबाकीच्या दृष्टीनेही त्यांनी आपले डावपेच केले असावेत, असाही अंदाज लावला जात आहे. त्यांचे विरोधक रणजितसिंह नाईक निंबाळकर व जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या खेळ्यांमुळे त्यांच्या वर्चस्वाला धडका बसायला सुरवात झाली. रणजितसिंह भाजपकडून खासदार झाले. गोरेही भाजपमध्ये गेले. त्यामुळे रामराजेंच्या पक्षांतराच्या चर्चेत भाजपचे नाव तसे पिछाडीवर होते.
शिवसेनेकडे ते जातील, असा कयास बांधण्यात येत होता. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्याच्या राजकारणात उदयनराजे भोसले, रणजितसिंह, जयकुमार गोरे यांच्याशी त्यांचा संघर्ष राहिला आहे. त्यांच्या बरोबरीने राहणारे शिवेंद्रसिंहराजे भोसलेही आता भाजपकडे गेले आहेत. पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्यापासून ते जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकांत दिसलेले नाहीत. आजही ते ना फलटणमध्ये दिसतायत ना साताऱ्यात. पण तरीही ते सर्वत्र असणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय अजून उघडपणे बाहेर आलेला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काय चित्र असेल त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असण्याचीच शक्यता आहे. कारण सत्ता त्यांना सोडत नाही, हे समीकरण शेवटी उरतेच. अनुकूलता असो की प्रतिकुलता, सत्ता आणि रामराजे सोबतच प्रवास करतात, हे चित्र विधानसभा निवडणुकीनंतरही असेल तर महिनाभरातील पक्षांतराच्या चर्चेत बरेच काही दडले होते, हेही कालौघात स्पष्ट होणार आहे.