नाराजी दूर ठेवून कामाला लागण्याचे शरद पवारांचे नेते, कार्यकर्त्यांना आवाहन
कोल्हापूर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्षांकडून आपापली व्युहरचना आखण्यास सुरूवात झाली आहे. कालच सर्व पक्षाच्या इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर आज कोल्हापूरात महाआघाडीची बैठक घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. दरम्यान, आपल्यातील सर्व नाराजी दूर करून कामाला लागण्याचे आवाहन यावेळी शरद पवार यांनी केले आहे.
बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी ,माजी मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पी.एन.पाटील हेदेखील उपस्थित आहेत. यावेळी आपल्यातील सर्व नाराजी बाजूला ठेऊन कामाला लागा असे आवाहन शरद पवार यांनी केले. तसेच शाहू नगरीतून वेगळ्या विचाराच्या शक्ती मोठ्या होतात याचा धक्का बसतो त्यामुळे आता इथल्या विचारांशी ते सुसंगत नाही, त्यामध्ये आता बदल करायचा आहे. प्रत्येक उमेदवार आपला समजा आणि इथं पुरोगामी विचारांशी तडजोड होत नाही हे दाखवून द्या असेही पवार यांनी म्हटले. केवळ हिंदुत्ववादाचा विचार देशासाठी घातक असून सर्व धर्मियांचा सन्मान करणं गरजेच असल्याचेही यावेळी शरद पवार यांनी म्हटले. तसेच पक्षांतर्गत असणारी नाराजी सोडून आपण सर्वांनी निवडणुकीला समोर जायचं आणि यशच मिळवायचे असा निर्धारही यावेळी पवारांनी केला
कोल्हापूरातील विचार आम्ही देश आणि देशाबाहेर मांडतो पण गेल्या निवडणुकीत पुरोगामी विचार सोडून दुसरी शक्ती वाढली याचा धक्का बसला असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. तसेच या निवडणुकीत एकजुटीने प्रयत्न केले तर यश मिळेल आणि बदलांमध्ये कोल्हापूरवासीय सहभागी होतील असा विश्वास असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले.