पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी) -तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सरकारचे प्राधान्य असून भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी विकास आराखड्याव्यतिरिक्त इतर विकासकामांसाठीचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
पालखीतळ, मार्ग विकास आराखड्यातील पुणे जिल्ह्यातील देहू, आळंदी, भंडारा डोंगर व सुदुंबरे विकास आराखडा कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.पालकमंत्री पाटील यांनी तिर्थस्थळाच्या परिसरातील नवीन रस्ते, पुल, भक्तनिवास बांधकाम, घाट बांधकाम, मल:निःसारण, स्वच्छतागृहे आदी कामांचा आढावा घेतला.
यावेळी पाटील म्हणाले, तीर्थक्षेत्रांच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिले आहे. या विकास आराखड्यात कमतरता भासणाऱ्या मात्र भाविकांच्या गरजा लक्षात घेऊन आणखी काही विकासकामे सुचवायची असल्यास, त्या विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
राज्यातील तिर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याअंतर्गत जिल्ह्यातील देहू, आळंदी या प्रमुख तिर्थक्षेत्रांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात अले आहे. याअंतर्गत रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, स्वच्छता या सुविधांचे सक्षमीकरण केले जात आहेत. त्याकरिता राज्य सरकारच्या वतीने या विकासकामांचा वेळोवेळी आढावा घेतला जात असून, मागणीनुसार निधीदेखील पुरविला जात आहे. या विकास आराखड्याअंतर्गत देहू-आळंदीमध्ये अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.
पूर्ण झालेली कामे देहू नगरपंचायतीकडे हस्तांतरित करणार
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने देहूमध्ये अनेक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. देहू येथे पूर्ण झालेली कामे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करण्यात यावीत. तिर्थस्थळाच्या ठिकाणी स्वच्छता राहील आणि भाविकांना असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी व त्यासाठी आवश्यक कामे प्रस्तावित करावी, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.